पणजी : केंद्रीय पर्र्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे गुरुवारी सायंकाळी चार वाजता दिल्लीहून गोव्यात परतणार आहेत. खासदारपदी निवडून आल्यानंतर नाईक हे दिल्लीला गेले होते. तिथे त्यांचा केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र ताबा) म्हणून शपथविधी पार पडला. त्यांना पर्यटन व कला आणि संस्कृती ही खाती मिळाली आहेत. त्यानंतर आता प्रथमच ते गोव्यात परतत आहेत. सायंकाळी चार वाजता दाबोळी विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. भाजप कार्यकर्ते तिथे त्यांचे स्वागत करतील, असे सूत्रांनी सांगितले. नाईक यांच्याकडे पर्यटन व कला आणि संस्कृती ही महत्त्वाची खाती सोपविल्याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना आनंद व्यक्त केला. गेली दहा वर्षे केंद्रातील काँग्रेसने गोव्यावर अन्याय केला. गोव्याला केंद्रात मंत्रिपद दिले नाही. श्रीपाद नाईक यांना राज्यमंत्रिपद व स्वतंत्र ताबा मिळाला आहे. ते केंद्रात कॅबिनेट मंत्री नसल्याने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये भाग घेता येणार नाही; पण अन्य सगळे निर्णय ते स्वतंत्रपणे घेऊ शकतील. गोव्याला त्याचा लाभ होईल. गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात साधनसुविधा आणखी वाढवून जगाच्या पर्यटन नकाशावर गोव्याचे नाव आणखी ठळक होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, केंद्राकडून यापूर्वी जो अनावश्यक निधी गोव्याकडे आला आहे, त्यापैकी काही निधी परत केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नादाखल सांगितले. जो निधी वापरणे शक्य नाही तो परत केला जाईल, असे ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)
श्रीपाद नाईक आज गोव्यात परतणार
By admin | Updated: May 29, 2014 07:18 IST