पणजी : राज्यात शालान्त मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा संपल्या असून निकाल १५ मे रोजी घोषित करण्यात येणार आहे. ३१ मार्चपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षा १७ एप्रिल रोजी संपणार असून मे महिन्याच्या अखेरीस लागणार असल्याची माहिती शालान्त मंडळाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी यंदा ६१ विशेष विद्यार्थी बसलेले आहेत.शालान्त मंडळातर्फे विशेष विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धा तास जास्त देण्यात आला आहे; जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवताना वेळेचा अभाव जाणवू नये. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वाचक आणि लेखनिक पुरविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचन आणि लेखनाची समस्या लक्षात घेता शालान्त मंडळातर्फे हा तोडगा काढण्यात आला आहे. तसेच या विद्यार्थ्यांची गैरसोय होता नये यासाठी विद्यार्थ्यांना तळमजल्यावर परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी जवळचे केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे.आतापर्यंत परीक्षा सुरळीत चालल्या असून कोणत्याच प्रकारचे अडथळे परीक्षेदरम्यान आलेले नाहीत. परीक्षेवेळी कॉपीचे प्रकारही घडलेले नाहीत आणि असे प्रकार घडू नयेत यासाठी भरारी पथकांद्वरे वारंवार पाहणी केली जात आहे, अशी माहिती शालान्त मंडळाचे सचीव भगीरथ शेटये यांनी दिली. (प्रतिनिधी)
बारावीचा निकाल १५ मे रोजी
By admin | Updated: April 8, 2015 00:55 IST