लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यात अजूनही पोर्तुगीजधार्जिणे लोक अस्तित्वात असून ते मराठीला विरोध करत आहेत. त्यामुळे दोन वर्षात मराठी मतपेढी बळकट करून मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून द्यावा, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी केले. मडगाव प्रखंडाच्या मराठी राजभाषा निर्धार मेळाव्यात वेलिंगकर बोलत होते.
दवर्ली येथील दुर्गा देवीच्या मंदिर सभागृहात शनिवारी संध्याकाळी मडगाव प्रखंडाचा मराठी राजभाषा निर्धार मेळावा झाला. व्यासपीठावर गो. रा. ढवळीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. वेलिंगकर म्हणाले, राज्यात मराठी संस्कृती, मराठी वर्तमानपत्रे, धार्मिक विधी, आरती, पूजा, पत्रव्यवहार हे सर्व मराठीतूनच होत आहे. असे असूनही मराठी भाषेवर अन्याय होत आहे.
वेलिंगकर यांच्या मराठी राजभाषा करण्याच्या प्रयत्नांना लोकांनी साथ द्यायला पाहिजे, असे मत यापूर्वी, गो.रा. ढवळीकर यांनी व्यक्त केले. मराठी भाषा ही संतांची भाषा असून ती एक समृद्ध भाषा असल्याचे ते म्हणाले. पूर्वी सर्वच ठिकाणी मराठीतूनच व्यवहार व्यायचा. कोंकणी जरी काही लोकांमुळे राजभाषा झाली तरीही ती कुठेही व्यवहारात वावरली जात नाही. आम्ही कोंकणी भाषेला बोली भाषाच मानतो, असे ढवळीकर म्हणाले.
तरच सरकारवर येईल दबाव
काही पोर्तुगीजधार्जिणे लोक अजूनही गोवा हा वेगळा प्रदेश म्हणतात. तो एक स्वतंत्र देशच म्हणून ओळखला जावा म्हणून काहींनी तर युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेला निवेदन, पत्रही लिहिले आहे. हेच लोक मराठी संस्कृतीला मारक ठरत आहेत. मराठी मतपेढी बळकट केल्यास सरकारवर मराठी राजभाषा करण्यास दबाव येईल.
युवकांचे मेळावे घेणार
वेलिंगकर यांनी, मडगाव प्रखंडातील मराठीप्रेमींना, जो पक्ष आणि उमेदवार मराठीला पाठिंबा देईल त्यालाच मतदान करायला आणि त्याच्याकडून मराठी राजभाषा करण्यास वचनबद्ध राहण्याची अट घालण्यास सांगितले. यापुढे, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात युवकांची संमेलने होतील आणि मराठी ऐक्य साधले जाईल.
'रोमी ही भारतीय लिपीच नाही'
या कार्यक्रमात नंतर, मराठीप्रेमींनी मराठी राजभाषा करण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. यानंतर, पत्रकारांशी बोलताना वेलिंगकर म्हणाले की, सासष्टी तसेच दक्षिण गोव्यातील काही भागात कोंकणी रोमी लिपीला राजभाषा म्हणून स्थान मिळावे अशी चळवळ सुरू आहे. मुळात रोमी ही भारतीय लिपिच नाही आणि त्यामुळे त्या लोकांची ही मागणी चुकीची आहे. आम्ही रोमि लिपीला कदापि राजभाषा दर्जा देण्यास मान्य होणार नाही. मराठी भाषेमुळेच गोव्यात भारतीय संस्कृती टिकून आहे. त्यामुळे मराठी ही राजभाषा झालीच पाहिजे, असे वेलिंगकर म्हणाले.