पणजी : गोवा व कर्नाटकमधील पाणी तंटाप्रश्नी मंगळवारी लवादासमोर सुनावणी होऊ शकली नाही. आता २७ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. कर्नाटक सरकारला जलदगतीने सुनावणी झालेली हवी होती; पण लवादाचे अध्यक्ष येऊ न शकल्याने लवादाने सुनावणी पुढे ढकलली. गोवा सरकारने आपले सर्व साक्षीदार लवादासमोर हजर करण्यासाठी तयार ठेवले आहेत. सुनावणी पुढे ढकलली गेल्यामुळे गोवा सरकारला पूर्वतयारी करण्यासाठी आणखी वेळ मिळेल. गोव्याचे पहिले साक्षीदार तज्ज्ञ डॉ. ज्योती प्रकाश हे मंगळवारी लवादासमोर हजर होणे अपेक्षित होते. दरम्यान, म्हादई पाणी तंटा प्रश्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा व तोडगा काढावा, अशी मागणी मॅगसेसे पुरस्कार प्राप्त पर्यावरणवादी राजेंद्र सिंग यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. म्हादई नदीचे पाणी वळविण्याच्या कर्नाटक सरकारच्या योजनेस राजेंद्र सिंग यांचा पाठिंबा आहे. कर्नाटकला पाणी वळविण्यास मान्यता दिली जावी, अशी मागणी सिंग यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. एका नदीतून दुसऱ्या नदीत पाणी वळविण्याच्या कल्पनेला माझा आक्षेप आहे; पण कर्नाटकच्या प्रकल्पास आपला पाठिंबा असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.
म्हादईप्रश्नी आता एप्रिलमध्ये सुनावणी
By admin | Updated: February 24, 2016 02:38 IST