पणजी : म्हादई पाणी तंटाप्रश्नी महाराष्ट्र सरकारची लवादासमोरील भूमिका पाहिली तर महाराष्ट्रदेखील कर्नाटकसोबत आहे असे वाटू लागते, अशी शंका गोव्याचे अॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. म्हादई नदीवर व या नदीशी निगडित सर्व नाल्यांवर मिळून एकूण १२ धरणे बांधण्याची योजना कर्नाटक सरकारने पुढे आणली आहे. महाराष्ट्रानेही चार धरणे बांधण्याची योजना पुढे आणली होती. गोव्याचे पाणीच बंद करायला महाराष्ट्र निघाले होते; पण गोवा सरकारने त्यास लवादासमोर ठामपणे आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रास एक पाऊल मागे घ्यावे लागले. बेळगावमधील काही व्यक्तींचाही म्हादईचे पाणी वळविण्याच्या कर्नाटकच्या योजनेस विरोध आहे. बेळगावमधील लोकांनी त्यासाठी महाराष्ट्र सरकारमार्फत लवादासमोर यायला हवे. दुर्दैवाने महाराष्ट्राची भूमिका ही कर्नाटकच्या बाजूने असल्यासारखे दिसून येते, असे नाडकर्णी म्हणाले. दोनापावल येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये गुरुवारी ‘म्हादई पाणी तंटा व परिणाम’ याविषयी चर्चासत्र पार पडले. नाडकर्णी त्या वेळी बोलत होते. कर्नाटकची योजना यशस्वी झाली तर, दूधसागर व सुर्ल हे गोव्याचे धबधबे अगोदर बंद पडतील. त्यानंतर गोव्याच्या जैविक, जल व अन्य प्रकारच्या संपदेवर मोठा परिणाम होईल. गोव्याचे भवितव्यच अडचणीत येईल, असे नाडकर्णी म्हणाले. कर्नाटकच्या डावाविरुद्ध लढण्याबाबत आम्ही सगळेच संघटित आहोत. आमचा या लढ्यास पाठिंबा आहे, असे विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे म्हणाले. (पान २ वर)
म्हादईप्रश्नी महाराष्ट्राची कर्नाटकला फूस?
By admin | Updated: February 12, 2016 03:57 IST