पणजी : इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची पध्दत पुढे चालू ठेवावी की बंद करावी याबाबत चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत वेगवेगळ्या गोष्टी उघड झाल्या. त्यामुळे या पध्दतीतील त्रुटी दूर करूनच त्याची अंमलबजावणी केली जावी, असा सूर व्यक्त झाला. विद्यार्थ्यांचा स्तर उंचावण्यासाठी सर्वंकष मूल्यांकन पध्दत फायदेशीर असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. सर्व संबंधित घटकांना ३१ आॅगस्टपर्यंत आपापल्या सूचना लेखी स्वरूपात सादर करण्यास शिक्षण खात्याने सांगितले आहे. या सूचना नंतर कें द्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठवल्या जातील. केंद्र सरकारने सर्व राज्यांना धोरण ठरविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्या अनुषंगाने पर्वरी येथे ही बैठक झाली. शिक्षण खात्याचे वरिष्ठ अधिकारी, शिक्षक प्रतिनिधी, उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयांचे अधिकारी, हेडमास्तर, शिक्षणतज्ज्ञ, सर्वशिक्षा अभियान, एससीईआरटी, गोवा शालान्त व उच्च माध्यमिक मंडळ, डायोसेझन मंडळ, गोवा शिक्षण विकास महामंडळ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नाही. मात्र, विद्यार्थ्यांचा स्तर उंचावण्यासाठी सर्वंकष मूल्यांकन पध्दत राबवली जाते. ती फायदेशीर असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचेही मत आहे. (प्रतिनिधी)
त्रुटी दूर करूनच अंमलबजावणी हवी
By admin | Updated: August 25, 2015 01:29 IST