९ जानेवारी २0११ रोजी रामनगरी-मुगाळी येथे मुंडके छाटलेल्या अवस्थेत जो मृतदेह सापडला होता, तो नक्की सुल्तान बेल्लारीचाच होता का? ही घटना घडून जवळपास साडेचार वर्षे उलटल्यानंतर या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर हा प्रश्न उभा झाला आहे. हा मृतदेह सुल्तानचाच असल्याचे पोलीस नि:संदिग्धपणे सिद्ध करू शकलेले नसून या प्रकरणात तपास करताना राहिलेल्या असंख्य त्रुटी यामुळेच या प्रकरणातील संशयितांना निर्दोष मुक्त होण्याची संधी प्राप्त झाल्याचे एकंदर खटल्याचा आढावा घेतला असता दिसून येते.या प्रकरणात दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी अजूनही निकालाची प्रत जाहीर केलेली नाही. मात्र, खुल्या न्यायालयात सोमवारी त्यांनी संक्षिप्तपणे जो आदेश दिला, त्यात संशयितावरील आरोप सिद्ध करण्यास अभियोग पक्षाला पूर्णपणे अपयश आल्याचे नमूद केले होते. बजरंग दलाचा नेता जयेश नाईक याचा या संशयितांमध्ये समावेश असल्याने, तसेच या संघटनेचे आणखी काही सदस्यही या प्रकरणात संशयित असल्याने या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होेते.या प्रकरणात अभियोग पक्षाचा दावा असा होता की, व्यवसायाने चोर असलेल्या सुल्तान बेल्लारीने सध्या निर्दोष सुटलेला संशयित राजेश नाईक याच्या दुकानात चोरी केली. या वेळी दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर सुल्तानची छबी उमटली. याच छबीच्या आधारे इतरांनी सुल्तानचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पेड-सुरावली येथे सुल्तान राहात असल्याची माहिती मिळाल्यावर तिथून त्याचे अपहरण करण्यात आले होते. नंतर त्याला समर्थ गडावरील व्यायामशाळेत कोंडून ठेवले. सध्या फरारी असलेला संशयित विनोद यादव याने त्याचा नानाप्रकारे छळ केला. या छळामुळे गलितगात्र झालेल्या सुल्तानचे प्राण जाणार याची खात्री पटल्यावर चॉपरने त्याचे मुंडके छाटण्यात आले.(पान २ वर)
मुंडके छाटलेला ‘तो’ मृतदेह सुल्तानचाच?
By admin | Updated: June 24, 2015 01:28 IST