पणजी : या राज्यात स्वातंत्र्यसैनिकांना मान दिला जात नाही, मान देत नसाल तर आम्हाला बोलावलेच कशाला, असा खडा सवाल करून क्रांतिदिनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीतच स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष श्याम सुंदर नागवेकर यांनी सरकारची गुरुवारी (दि.१८) धुलाई केली. क्रांतिदिनाचा कार्यक्रम हा धुलाईमुळे गाजला. आझाद मैदानावर आयोजित या कार्यक्रमात एका बाजूने पाऊस मंडपाच्या बाहेर धुलाई करीत होता तर दुसऱ्या बाजूने स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष नागवेकर सरकारची धुलाई करीत होते. यामुळे संपूर्ण मंडपात शांतता पसरली होती. क्रांतिदिनीच्या कार्यक्रम पत्रिकेवरही स्वातत्र्य सैनिकांचा उल्लेख केला नव्हता. या गोष्टीकडे निर्देश करून नागवेकर यांनी सरकारवर आसूड ओढले. १८ जून हा स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आहे आणि सन्मान करता येत नसेल तर निदान बोलावून अपमान तरी करू नका. मंत्र्यांच्या गाड्यांना कार्यक्रमस्थळी येण्यास परवानगी असते; परंतु स्वातंत्र्यसैनिकांना दूर गाड्या ठेवून चालत यावे लागत आहे. पोर्तूगीज गेले; परंतु पोलिसांनी पोर्तुगिजांचा चसा चालविला असल्याचा आरोप त्यांनी केला. गोवा हा स्वातंत्र्यसैनिकांनी मूक्त केला आहे, त्यामुळे तुमच्या मुळे आम्ही आहोत हा समज मंत्र्यांनी मनातून काढून टाकावा आणि आमच्यामुळे तुम्ही आहात हे पक्के ध्यानात ठेवावे असे त्यांनी सांगितले. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन योजना सुरू केली नसती तर स्वातंत्र्यसैनिकांवर रस्त्यावर पडण्याची पाळी आली असती, असे ते म्हणाले. स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले होते. ते दिल्लीला जाऊन संरक्षणमंत्री बनल्यामुळे आता विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आश्वासनपूर्ती करावी अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी त्यानंतर बोलताना स्वातंत्र्यसैनिकांचा राज्याला आदर असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या प्रलंबित मागण्याही पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर, पर्यावरणमंत्री अॅलिना सालढाणा, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस्क डिसोझा व आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांसमोर सरकारची धुलाई
By admin | Updated: June 19, 2015 01:39 IST