पणजी : केंद्रात काँग्रेसप्रणीत आघाडी सरकार अधिकारावर होते, तेव्हा पणजी शहराच्या विकासासाठी आणि सौंदर्यीकरणासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने पाठवला होता. मात्र, राज्यातील भाजप सरकारला गेल्या तीन वर्षांत हा निधी वापरण्यात अपयश आले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी शुक्रवारी येथे केली. पत्रकार परिषदेत फालेरो म्हणाले की, केंद्राने ३०० कोटींचा निधी देऊनदेखील तो न वापरणे हा सरकारने केलेला फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. सांतइनेज नाला उसपण्यासाठीही केंद्राने निधी पाठवला होता, तोही वापरला गेला नाही. पणजीतील कचरा समस्या सोडविण्यासाठीही निधी मंजूर केला गेला होता. पणजीवासियांना आज दुर्गंधीमय वातावरणात राहावे लागत आहे, हाच भाजप पक्ष आता पणजीला स्मार्ट सिटी बनविण्याचे आश्वासन देत आहे. विद्यमान सरकारने गेल्या तीन वर्षांत प्रत्येक विषयावर भूमिका बदलल्या. अनेक यू-टर्न घेतले. मांडवी नदीतून कॅसिनो हटवू, असे सांगणाऱ्या भाजपने कॅसिनोंविरोधात तीन वर्षांत काहीच केले नाही. विरोधात असताना त्यांनी कॅसिनोंविरुद्ध मेणबत्ती मोर्चा काढला होता. पणजीत वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. गेल्या तीन वर्षांत सरकारने त्यावर काहीच उपाय काढला नाही, असे फालेरो म्हणाले. पणजीला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
३०० कोटींचा निधी वापरात सरकार अपयशी
By admin | Updated: February 7, 2015 01:53 IST