पणजी : गोव्याला घटनेच्या कलम ३७१ अन्वये खास दर्जा देणे अशक्य असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत खासदार शांताराम नाईक यांच्या प्रश्नावर लेखी स्पष्ट केले आहे. खास दर्जासाठी राज्य सरकारने काही लेखी प्रस्ताव दिला आहे का किंवा घटनेच्या कलम ३७१ अन्वये खास दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे का, असा प्रश्न शांताराम यांनी केला होता. त्यावर मे २0१३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून मिझोरम, हिमाचल प्रदेश व उत्तरांचलच्या धर्तीवर घटनेच्या कलम ३७१ अन्वये खास दर्जाची मागणी केली होती. राज्यातील जमिनी शाबूत ठेवण्यासाठी खास दर्जा मागितला होता, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कलम ३७१ अन्वये १२ राज्यांना खास तरतुदी लागू केलेल्या आहेत, अशी माहितीही मंत्र्यांनी एका प्रश्नावर दिलेली आहे. गोवा वगळता अन्य कोणत्याही राज्याने खास दर्जाची मागणी केलेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
गोव्याला खास दर्जा अशक्य
By admin | Updated: March 3, 2016 03:08 IST