फोंडा : डॉ. नरेंद्र दाभोळकर हिंदुद्वेष्टे होते. त्यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातनच्या साधकांना गोवण्याचा प्रयत्न झाला. दाभोळकरांप्रमाणेच हिंदुद्वेष्ट्या असलेल्या तिस्ता सेटलवाड, कमल पारोखी तसेच असगर अली इंजिनिअर यांच्याविरुद्धचा लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी रामनाथी येथे शुक्रवारी केले. हिंदू जनजागृती समितीतर्फे गोव्यात रामनाथी येथे आयोजिलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर भारत सेवाश्रम संघाचे बंगाल व झारखंड प्रमुख स्वामी प्रदीप्तानंद महाराज, सांगली येथील ईश्वरबुवा रामदासी, खंडवा (मध्य प्रदेश) येथील गोरक्षा अभियानप्रमुख १0५ प्रयत्न सागरजी महाराज, तरुण हिंदू संघटना-झारखंडचे नील माधव दास, तसेच सुदर्शन या हिंदी वृत्तवाहिनीचे संचालक सुरेश चव्हाण उपस्थित होते. गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय स्तरावरील निवडणूक प्रचारात हिंदू राष्ट्राचा विषय येत नसल्याबद्दल डॉ. पिंगळे यांनी खेद व्यक्त केला. देशात नुकतेच झालेले सत्तांतर हे हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी पूरक नसल्याचे पिंगळे यांनी सांगितले. ते म्हणाले, देशातील हिंदू संतांची विविध प्रकारे गळचेपी सुरू आहे. करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या आसाराम बापू, जयेंद्र सरस्वती, स्वामी नित्यानंदजी यासारख्या संतांवर लांच्छनास्पद आरोप केले जात आहेत. तरुण हिंदू संघटना-झारखंडचे नील माधव दास यांनी भारतात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंचा छळ तर मुसलमानांचे लांगूलचालन होत असल्याचा आरोप केला. संपूर्ण जगभरात मुसलमान ही समस्या बनली असताना भारतात मात्र धर्मनिरपेक्षतावादी राजकारण्यांसाठी मुसलमान ही संपत्ती बनली आहे. राजकीय स्वार्थापोटी या मुसलमानांचे चोचले पुरविले जात आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी हिंदू राष्ट्राची स्थापना होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. स्वामी प्रदीप्तानंद, ईश्वरबुवा रामदासी, १0५ प्रयत्न सागरजी महाराज यांनीही हिंदू राष्ट्र स्थापनेच्या मुद्द्याच्या आधारे मार्गदर्शन केले. तत्पूर्वी शंखनाद आणि मंत्रपठणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. स्वामी प्रदीप्तानंद यांच्या हस्ते अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच सनातन निर्मित गीतादर्शन आणि बालसंस्कार ग्रंथमालेतील बोधकथा या नूतन ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन विनायक शानभाग आणि अभिजित देशमुख यांनी केले. सहा दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात बांगलादेशातून होणारी घुसखोरी, धर्मांतर, गोहत्या, लव्ह जिहाद, संस्कृती रक्षण, मंदिर रक्षण, हिंदूंमधील धर्मजागृती, हिंदू धर्माचा जगभर प्रसार, विदेशस्थित हिंदूंचे रक्षण यांसारख्या समस्यांवर चर्चा होणार आहे. या समस्यांच्या निवारणासाठी समान कृती कार्यक्रमही निश्चित केला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
दाभोळकरांसारख्या हिंदुद्वेष्ट्यांशी लढा सुरूच
By admin | Updated: June 21, 2014 01:45 IST