पणजी : थिवी उपकेंद्रातून कदंब पठारावर येणाऱ्या ११0 केव्ही वीजवाहिनीत मोठा बिघाड झाल्याने राजधानी पणजीसह संपूर्ण तिसवाडी तालुक्यात गुरुवारी पाच तास वीज गुल झाली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा सायंकाळी ५ नंतर सुरळीत झाला. आॅक्टोबरच्या असह्य उष्म्याने आधीच हैराण झालेल्या लोकांना याची मोठ्या प्रमाणात झळ पोहोचली. पंखे, एसी चालू न शकल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही उकाड्याने हैराण केले. वीज उपकरणे चालू न शकल्याने गृहिणींची परवड झाली. हॉटेल्स, कोड्रिंक्सची दुकाने तसेच अन्य व्यावसायिकांचा धंदा बुडाला. वीज गडप झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. विद्यालयांमध्ये पंखे बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. कला अकादमीत खंडित वीजपुरवठ्यामुळे नृत्य, गायन, वादन वर्गाला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय आला. दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात सर्वत्र ११ केव्ही आणि ३३ केव्हीच्या वीजवाहिन्या भूमिगत टाकण्यासाठी २0 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. केंद्र सरकारकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. (प्रतिनिधी)
खंडित विजेमुळे राजधानी वेठीस
By admin | Updated: October 16, 2015 02:54 IST