पणजी : भाजपमधील बंडखोरांचा बाबूश मोन्सेरात यांच्याकडे ओघ चालूच असून नव्या घडामोडींनुसार बाबूश यांनीही आपल्या पॅनलमध्ये दोन ते तीन प्रभागांमध्ये उमेदवार बदलण्याची तयारी चालवली आहे. भाजपचे जास्तीत जास्त बंडखोर गळाला लावण्याची व्यूहरचना मोन्सेरात करीत आहेत. प्रभाग क्रमांक २२ मध्ये अविनाश भोसले यांच्याऐवजी आता भाजपचे कट्टर कार्यकर्ते संदेश केरकर यांच्या पत्नीला रिंगणात उतरविण्याचे त्यांनी निश्चित केल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. याबाबत अधिकृत घोषणा शनिवारी किंवा रविवारी केली जाईल. भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याने दुखावलेले काही असंतुष्ट स्वत: बाबूश यांच्या संपर्कात आहेत. मोन्सेरात यांनी रायबंदर भागातून प्रचाराला सुरुवात केली असून पहिल्या फेरीत प्रभाग ३0 मधील प्रचार त्यांनी पूर्ण केला आहे. सध्या प्रभाग २९ मध्ये ते आपल्या पॅनलमधील उमेदवारांबरोबर घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. ते म्हणाले की, रायबंदर भागातील लोकांची महापालिकेकडून सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याची तक्रार आहे. पाण्याची तीव्र टंचाई या भागात आहे. तसेच कोणत्याही सुविधा नाहीत. असे असताना महापालिकेत हा भाग येत असल्याने प्रत्येक घराला वार्षिक ३ हजार रुपये घरपट्टी भरावी लागते, ती परवडत नाही. दरम्यान, पर्रीकर पुन्हा गोव्यात आले आणि पणजीतून त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली, तरी आपण रिंगणात उतरणार असल्याचेही बाबूश यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
बंडखोरांचे भाजपला हादरे
By admin | Updated: February 6, 2016 03:06 IST