पणजी : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भक्कम असे सरकार अधिकारावर येत असल्यामुळे गोवा सरकारही आता दबावमुक्त झाले आहे. आता कोणत्याच प्रश्नावरून सरकारवर विरोधकांचाही दबाव येणार नाही आणि सत्ताधारी आघाडीचेही घटक सरकारला कोणत्याच विषयाबाबत आव्हान देऊ शकणार नाहीत. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अतिशय भक्कम असे सरकार चालविण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता लाभली आहे. काँग्रेसचे काही आमदार पर्रीकर सरकारबाबत आता सहानुभूती दाखवत असले तरी, सरकारला या आमदारांची गरजच नाही, अशी स्थिती आली आहे. आमदार माविन गुदिन्हो किंवा बाबूश मोन्सेरात यांच्या पाठिंब्याची किंवा सहानुभूतीची आता भाजपला गरज राहिलेली नाही. नुवेचे आमदार मिकी पाशेको यांना यापूर्वी मंत्रिपद देण्याची ग्वाही भाजपने दिली होती, असे सांगितले जाते; पण आता सरकार एवढे भक्कम बनले आहे की पाशेको यांना मंत्रिमंडळात घेण्याचा सरकार विचारही करणार नाही, असे काही भाजप पदाधिकार्यांना वाटते. दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे बहुतेक आमदार सध्या अविश्वासू बनले आहेत. ते पक्षाचे काम स्वत: पुढे नेण्यासही उत्सुक नाहीत. लोकसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाची साधी बैठकदेखील झाली नाही. पराभवाची कारणमिमांसा करण्याचीही गरज आमदारांना वाटत नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस हेच गोव्यात पक्षाचे काम वाढवतील व पक्ष बळकट करतील, असा विश्वास अजूनही पक्षाचे केंद्रीय निरीक्षक दिग्विजय सिंग यांना वाटतो. काँग्रेसचे एकही आमदार यापूर्वीच मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी शत्रूत्व घेण्याचे टाळत होते. एकट्या आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा यास अपवाद होता. आता तर राज्य सरकार खूपच भक्कम बनले असल्याने काँग्रेसचे कुणीच आमदार सार्वजनिक प्रश्नाच्या अनुषंगाने सरकारविरुद्ध आवाज उठवणार नाहीत, याची कल्पना दिग्विजय सिंग यांनाही आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. जॉन फर्नांडिस यांना लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या काही आमदारांनी सहकार्य केले नाही याची कल्पनाही सिंग यांना गोव्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांकडून आली आहे. जॉन दिल्लीत असून ते बुधवारी पुन्हा दिग्विजय सिंग यांना भेटणार आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी पक्षाने गोव्यात जो निधी पाठवला होता, त्या निधीच्या व्यवहारांमध्ये स्वत: फर्नांडिस यांनी कुठेच हस्तक्षेप केला नाही. आपल्यावर भविष्यात कोणताच आरोप यायला नको म्हणून ते स्वत: अशा व्यवहारांपासून दूर राहिले. काँग्रेसचे यापूर्वीचे काही प्रदेशाध्यक्ष मात्र पक्षाच्या आर्थिक व्यवहारांमध्येच जास्त रस घेत होते. काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचार कामावेळी पक्षनिधी योग्य प्रकारे वापरला काय, याचीही चौकशी यापुढील दिवसांत अखिल भारतीय काँग्रेसच्या स्तरावरून होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. (खास प्रतिनिधी)
गोव्यातील भाजपा सरकारही आता दबावमुक्त
By admin | Updated: May 21, 2014 02:01 IST