पणजी : सरकारी मराठी अकादमीची हंगामी कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी प्रा. अनिल गजानन सामंत यांची नियुक्ती केली आहे. १३ सदस्यीय कार्यकारिणीवर ९० दिवसांत अकादमीची घटना तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रायबंदर येथे प्रसूतिशास्त्र विभागाच्या जुन्या इमारतीत या अकादमीला जागा देण्यात आलेली आहे. उपाध्यक्षपदी साहित्यिक अशोक नाईक तुयेकर (पुष्पाग्रज) यांची नियुक्ती केली आहे. या कार्यकारिणीवर इतर सदस्यांमध्ये लेखक चंद्रकांत महादेव गावस, पौर्णिमा राजेंद्र केरकर, वल्लभ केळकर, गजानन मांद्रेकर, पत्रकार सागर जावडेकर, परेश प्रभू, जनार्दन वेर्लेकर, तुषार टोपले, आनंद मयेकर, दशरथ परब यांचा समावेश आहे. शशांक ठाकूर हे सदस्य-सचिव म्हणून काम पाहतील. १५ आॅगस्टपर्यंत कार्यकारिणी जाहीर करू, अशी घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत केली होती. ही कार्यकारिणी अस्थायी स्वरूपाची आहे. सध्या अस्तित्वात असलेली मराठी अकादमी कारभार सुधारण्यास तयार नाही. ६० लोकांपुरतीच ती मर्यादित ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे इतर मराठी भाषिकांवर अन्याय होतो, अशा तक्रारी होत्या. कारभार सुधारण्यास सरकारने वेळही देऊन पाहिला; परंतु कोणताही फरक पडला नाही. त्यामुळे ही अकादमी ताब्यात घेण्याचा इशारा सरकारने दिला होता. आता नव्या मराठी अकादमीची कार्यकारिणी सरकारने जाहीर केली आहे. मराठीचे संवर्धन आणि विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले. मराठी भाषिक लोक १० ते १५ कोटी आहेत. महाराष्ट्रात मराठी आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेच्या आक्रमणाचा वेगळा धोका मराठीला नाही; परंतु तो कोकणीला मात्र आहे. त्यामुळे कोकणीकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
सरकारी मराठी अकादमीची हंगामी कार्यकारिणी जाहीर
By admin | Updated: August 13, 2014 01:46 IST