मडगाव : भाजपाच्या राजवटीत गोवेकरांना २0१४ साल एकदम वाईट गेले. किमान चालू वर्ष तरी बरे जावे, अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी व्यक्त केली. एकेकाळी दरडोई उत्पन्नात गोमंतकीय अग्रेसर होता; पण भाजपाच्या कारकिर्दीत बदल झाला असून आता गोमंतकीय दरडोई सर्वांत जास्त कर्ज असलेला बनला आहे, अशी टीका त्यांनी केली. प्रत्येक गोमंतकीयाच्या डोक्यावर भाजपा सरकारने ८0 हजारांचे कर्ज थोपले आहे, असे ते म्हणाले. फालेरो यांनी शनिवारी दक्षिण गोव्यातील प्रसारमाध्यमांशी वार्तालाप केला. या वेळी उपाध्यक्ष मोती देसाई, एम. के. शेख, सरचिटणीस सुनील कवठणकर, यतीश नाईक व दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सुभाष फळदेसाई हे उपस्थित होते. भाजपा सरकारने एका बाजूने अनेक योजना सुरू करून लोकांना पैशांची खिरापत वाटण्यास सुरुवात केली आहे, तर दुसऱ्या बाजूने करांचा बोजा एवढा वाढविला आहे की त्यामुळे सामान्य गोमंतकीयांचा कणाच मोडून गेला आहे, असे ते म्हणाले. अशा परिस्थितीत नवीन वर्षात तरी गोमंतकीयांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रादेशिक आराखड्याबद्दल बोलताना फालेरो म्हणाले, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत प्रादेशिक आराखडा तयार न केल्यास पदत्याग करू, असे सांगितले होते. पर्रीकर आपल्या शब्दाला जागले. दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी आता पदत्याग करून ते दिल्लीत गेले आहेत, अशी उपरोधिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. बंद झालेल्या खाणी सुरू करणे, गोव्यास खास दर्जा मिळवून देणे या साऱ्या आघाड्यांवर भाजप सरकारला अपयश आल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
२0१४ गोवेकरांना वाईटच
By admin | Updated: January 4, 2015 02:29 IST