पावसामुळे शेतकरी समाधानी : जिल्हाभरात खरीप पिके बहरलीवैरागड : जून महिन्याच्या सुरूवातीलपासून वरूण राजाची कृपादृष्टी झाल्याने यंदा खरीप पिके चांगली बहरली आहेत. सध्या आरमोरी तालुक्याच्या वैरागड परिसरासह जिल्हाभरात धानपिकाच्या निंदणाचे काम जोमात सुरू आहे.यंदा पावसाने जुलै महिन्यातच पावसाची सरासरी गाठली. त्यामुळे जिल्हाभरातील नदी, नाले, तलाव, बोड्या पूर्णत: भरले. वैरागड परिसरात सध्या बोड्या पावसाने तुडूंब भरून वाहत आहेत. आॅगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाल्याने यंदाच्या खरीप हंगामात भरघोस उत्पादन येणार, अशी आशा शेतकरी व्यक्त करू लागला आहे. मागील चार-पाच वर्षात निसर्गाच्या अवकृपेमुळे गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. कमी पावसामुळे पीक करपली. तर अधिक पाऊस झाल्याने धानपिके वाहून गेली. त्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या छायेत सापडला होता. मात्र यंदा नियमित व पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धानपिकाची रोवणी अगदी वेळेवर उरकून घेतली. याशिवाय तूर, मका, सोयाबीनसह विविध खरीप पिकांचीही लागवड केली. गडचिरोली जिल्ह्यात सध्या खरीप पिके बहरली आहेत. शेतकरी आनंदी असल्यामुळे पोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी त्यांनी तयारी दर्शविली आहे. कृषी विभागाच्या वतीने खरीप पिकावरील विविध रोगांवरील उपाययोजना गावागावात जाऊन शेतकऱ्यांना सांगितल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार रोग व किडीवर नियंत्रण मिळविले आहे. (वार्ताहर)
धानपीक निंदणाचे काम जोमात
By admin | Updated: September 1, 2016 01:38 IST