गडचिरोली : वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विविध गैरराजकीय संघटनांनी लढा उभारला आहे. यापुढे जाऊन जनमंच या संघटनेच्यावतीने २० व २१ सप्टेंबरला सिंदखेड राजा ते दीक्षाभूमी अशी ‘विदर्भमुक्ती यात्रा’ काढली जाणार आहे. या यात्रेत गडचिरोलीसह विदर्भातील जनतेने स्वयंस्पूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जनमंचचे संयोजक चंद्रकांत वानखडे यांनी केले.गडचिरोली येथील विश्रामभवना आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जनमंचचे पदाधिकारी प्रकाश इटनकर, जनमंचचे गडचिरोली जिल्हा संयोजक अरूण पाटील मुनघाटे, रोहिदास राऊत, माजी जि. प. अध्यक्ष समय्या पसुला, पांडुरंग घोटेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल खोब्रागडे, बंडू शनिवारे, विवेक चडगुलवार, मोरेश्वर मानपल्लीवार, सोमनाथ पोपट यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. स्वतंत्र विदर्भ राज्याला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांची भूमिका विदर्भाबाबत काय आहे, हे मांडण्यास भाग पाडण्यासाठी विदर्भमुक्ती यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या माध्यमातून जनमाणसामध्ये स्वतंत्र विदर्भाविषयी जनजागृती केली जाणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सामूहिक राहणार असून २० सप्टेंबरला सकाळी १० वाजता बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या जिजामातेच्या जन्मगावापासून यात्रेला सुरूवात होईल. खामगाव-अकोला मार्गे त्याच दिवशी सायंकाळी अमरावतीला पोहोचेल. २१ सप्टेंबरला सकाळी अमरावतीहून निघून सायंकाळी ५ वाजता नागपूरात व्हेरायटी चौकात पोहोचेल. व्हेरायटी चौक ते रहाटे कॉलनी मार्गे दीक्षाभूमीवर यात्रेचा समारोप होईल. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना उपस्थित राहण्याबाबत विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती चंद्रकांत वानखडे यांनी या बैठकीत दिली. या यात्रेमध्ये ५०० वाहने सहभागी होतील. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनीही स्वयंस्पूर्तपणे या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीतून करण्यात आले आहे. यात्रेसाठी रथ तयार करण्यात आला असून या रथावर राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा राहणार आहेत, अशी माहितीही देण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)
विदर्भ राज्यासाठी राजकीय पक्षावर दबाव वाढविणार
By admin | Updated: September 10, 2014 23:39 IST