अंगणवाडीचे विद्युतीकरण : सेविकांसमोरील प्रश्नदिगांबर जवादे - गडचिरोलीअंगणवाडीत शिकणार्या चिमुकल्यांनाही अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मागास क्षेत्र अनुदान निधीतून जिल्हाभरातील १५0 पेक्षा अधिक अंगणवाडींचे फेब्रुवारी महिन्यात विद्युतीकरण करण्यात आले. मार्च महिन्यापासून वीजबिल येण्यास सुरूवात झाली. मात्र विद्युत बिल भरण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही. तीन महिन्यांचे देयक थकले असल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची तयारी वीज वितरण कंपनीने सुरू केली आहे. त्यामुळे अंगणवाडीचे विद्युतीकरण औटघटकेचेच ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वीजबिल भरण्याची जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.विद्यार्थ्यांना देशाचे भावी आधारस्तंभ मानले जात असल्याने केंद्र व राज्य शासन विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी-सुविधा व त्यांच्या पोषणासाठी कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. विद्यार्थीदशेची सर्वात पहिली व अत्यंत महत्वाची पायरी म्हणून अंगणवाडीचा उल्लेख केला जातो. अंगणवाडीतील शिक्षणाचे महत्व शिक्षणतज्ज्ञ व बालतज्ज्ञांच्या लक्षात आल्यानंतर या शिक्षणावर विशेष भर दिल्या जात आहे. अंगणवाड्या हायटेक करण्याच्या उद्देशाने जिल्हाभरातील संपूर्ण अंगणवाड्यांचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेऊन विद्युतीकरणाच्या कामाला डिसेंबर २0१३ मध्ये सुरूवात करण्यात आली. आजपर्यंत १५0 पेक्षा जास्त अंगणवाड्यांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. तर जवळपास १00 अंगणवाड्यांच्या विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. ज्या अंगणवाड्यांचे विद्युतीकरण पूर्ण होऊन वीज सुरू झाली. अशा अंगणवाड्यांना फेब्रुवारी महिन्यापासून वीज बिल येणे सुरू झाले आहे. वीज बिल भरण्याची नेमकी जबाबदारी कुणाची हे निश्चित करण्यात आले नसल्याने फार मोठा गोंधळ उडाला आहे. जिल्हा परिषद प्रशासन म्हणते, जिल्हाभरातील संपूर्ण अंगणवाड्यांचे महिन्याचे वीज बिल लाखो रूपये होईल. एवढे वीज बिल भरणे आर्थिकदृष्ट्या शक्य होणार नाही. निधीअभावी वीज बिल भरला जात नसल्याने पथदिव्यांचे व ग्रामपंचायतीचा विद्युत पुरवठा खंडीत होण्याची पाळी येते. अशा परिस्थितीत अंगणवाडीचे वीज बिल भरणे शक्य नाही, असे म्हणत ग्रामपंचायतींनीही जबाबदारी झटकली आहे. तर ४ हजार रूपये मानधनातून स्वत:चे कुटुंब सांभाळणार की, अंगणवाडीचे वीज बिल भरणार, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला आहे. ज्या ग्रामीण विकास यंत्रणेने विद्युत फिटींगचा खर्च उचलला, या विभागानेही वीज बिल भरण्याविषयी हात वर केले आहेत. या सर्व गोंधळामुळे मागील तीन महिन्यांचे बिल थकीत राहिले आहे. वीज बिल भरण्याच्या अडचणीचे लोण संपूर्ण जिल्ह्यात पसरले आहे. विद्युत फिटींगचा पैसा मागास क्षेत्र अनुदान निधीतून प्राप्त होत असला तरी सदर काम ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर करण्यात येत होते. वीज बिल भरण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक ग्रामपंचायतीचा आता अंगणवाडीचे विद्युत फिटींग करवून घेण्यास अनुत्सूक असल्याचे दिसून येत आहे. काही ग्रा.पं.नी तर घेतलेले ठरावही रद्द केल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्युतीकरण रखडण्याची शक्यता आहे.
वीजबिल भरणार कोण
By admin | Updated: June 9, 2014 23:36 IST