कोकडी : देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा (मोहटोला) येथून लग्न समारंभ आटोपून देसाईगंजकडे परत येणाऱ्या लग्न वऱ्हाड्यांच्या कारचा अचानक टायर फुटल्याने कार उलटून सहा जण जखमी झाल्याची घटना देसाईगंज-कोकडी मार्गावर देसाईगंजपासून चार किमी अंतरावर गुरूवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात कार चालक सोनू ऊर्फ पवन गुरूनुले (२५), गुरूदास गिरडकर (३०) रा. रामपूर (राजुरा), गौरव गुरूनुले (२७) रा. माफर राजुरा, अण्णा गुरूनुले (३४) रा. बालापूर तळोधी, देव वांडरे (३८) रा. रायपूर राजुरा, भास्कर निंबेकर (४२) रा. तळोधी आदी सहा जण जखमी झाले.देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा (मोहटोला) या गावी लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा भागातील काही वऱ्हाडी एमएच ४० के.आर. ०४७७ या कारने लग्न समारंभ आटोपून देसाईगंज मार्गे परत येत होते. दरम्यान दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालक पवन गुरूनुले याचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली. यात सहा जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी देसाईगंज रूग्णालयात भरती करण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत. लग्न वऱ्हाड्यांचे वाहन सुसाट वेगाने धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. (वार्ताहर)
लग्न वऱ्हाड्यांची कार उलटली
By admin | Updated: May 1, 2015 01:26 IST