विसोरा : देसाईगंज तालुक्यातील विसोरा ते शंकरपूर दरम्यान दोन किमी अंतर असलेल्या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी अनेकदा गावकऱ्यांनी प्रशासनाकडे लावून धरली होती. मात्र संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सदर मार्ग खड्ड्यात असल्याचे चित्र आहे. देसार्इंज-कुरखेडा या मुख्य मार्गावर विसोरा व शंकरपूर हे अवघ्या दोन किमी अंतरावर असलेली महत्त्वाची गावे, या दोन गावांच्या दरम्यान गाढवी नदी वाहते. सद्यस्थितीत या नदीवर असलेल्या ठेंगण्या पुलामुळे पावसाच्या दिवसात आठ ते दहा वेळा रहदारी बंद होते. त्यामुळे सदर नदीवर मागील तीन वर्षापासून उंच पूल बांधण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु अजूनही हे काम अपूर्णच आहे. पावसाच्या दिवसात काम बंद राहत असल्यामुळे प्रत्यक्ष कामाच्या पाहणीवरून येत्या वर्षभरातही हे काम पूर्ण होणार की नाही, यावर प्रश्नचिन्हच आहे. या पुलाच्या बांधकामासाठी संबंधीत विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ता उंच करण्यासाठी डांबरावर मातीचा भरणा केला आहे. यामुळे रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की, विसोरा ते शंकरपूर हे दोन किलोमीटरचे अंतर पार करायला पाच मिनिटाऐवजी आजघडीला अर्धा तास लागत आहे. वडसा ते कुरखेडा या मार्गे ये-जा करण्यासाठी वडसा-एकलपूर-कोरेगाव-शंकरपूर-कुरखेडा हा पर्यायी मार्ग आहे. मात्र या पर्यायी मार्गाने गेल्यास १० ते १२ किमी अंतराचा फेरा होतो. मात्र असे असले तरीही देसाईगंज-विसोरा-शंकरपूर-कुरखेडा याच मार्गाने सर्वात जास्त वाहनधारक खड्डे, धुळीचा त्रास सहन करून वाहने चालविणे पसंत करत आहेत, असे दिसते. परिणामी विसोरा-शंकरपूर या मार्गाची दुरवस्था झाली आहे. हा मार्ग गडचिरोली, नागपूर, कोरची, या शहरांकडे जात असल्याने जड वाहनांची नेहमीच वर्दळ असते तरीही रस्त्याच्या दुरवस्थेकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. या मार्गाची दुरूस्ती करण्यासंदर्भात नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. संबंधीत विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याची नागरिकांची चर्चा आणि या बाबतीत आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्त्यावर पडलेले लहान मोठे शेकडो खड्डे तत्काळ बुजवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
विसोरा-शंकरपूर मार्ग खड्ड्यात
By admin | Updated: September 21, 2014 23:51 IST