गडचिरोली : शहरात भूमिगत गटार लाइनचे काम करताना करारात ठरविण्यात आलेल्या नियमांचे कंत्राटदाराकडून पालन केले जात नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका माधुरी खोब्रागडे यांनी केली आहे. गडचिरोली शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून भूमिगत गटार लाइनचे काम करण्यात येत आहे.
नगर परिषद प्रशासनाने कंत्राटदाराला कामाचे आदेश देताना नियम व अटी घालून दिल्या होत्या. कंत्राटदाराने काम करताना नियमांचे पालन करण्यात येईल याची हमी दिली होती. मात्र, सद्य:स्थितीत गटार लाइनचे काम करताना ठरवून दिलेल्या कोणत्याही नियमांचे पालन होत नसताना दिसून येत आहे.
रस्त्याचे खोदकाम नियमानुसार होत नाही. रस्ते खोदल्यानंतर चेंबर बनविताना रस्त्यापेक्षा कितीतरी उंच बनविण्यात आले आहेत. यामुळे रस्ते उंच होऊन नागरिकांची घरे खाली गेली आहेत. रस्ता खोदण्यात आल्यानंतर तो पूर्ववत करून दिला जाईल, अशी अट कंत्राटदाराने मान्य केली होती. मात्र, रस्ता खोदल्यानंतर योग्य रीतीने पूर्ववत केला जात नसल्याने शहरातील प्रत्येक वाॅर्डातील रस्त्यावर ठिकठिकाणी उंचवटे निर्माण होऊन त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना नेहमीच अपघाताची भीती सतावत असते. रस्त्याचे काम नियोजनानुसार केले जात नसल्याने अनेक भागांतील रस्त्यावरील वाहतूक बंद पडत असल्याने नागरिकांना दुसऱ्या मार्गाने जावे लागते. नियोजनशून्य कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून नगरसेवकांनाही नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. नियोजनानुसार काम करीत नसल्याने त्याचे काम थांबविण्याची कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका माधुरी खोब्रागडे यांनी केली आहे.