गडचिरोली : जिल्ह्याचे मुख्य पीक धान असताना चाकोरीबाहेर जाऊन प्रयोगशील शेती करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात कार्यरत ग्रामसेवकाने केली व नीलगिरी शेतीचा प्रयोग यशस्वी करण्यात त्यांना यश आले. चामोर्शी तालुक्याच्या मुरखळा गावचे रहिवासी असलेले व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात ग्रामसेवक पदावर कार्यरत असलेले श्रीकृष्ण उद्धव मंगर यांच्याकडे वडिलोपार्जीत तीन एकर शेती आहे. त्यांनी सुरूवातीला इतरांप्रमाणेच भात पिकाची लागवड करणे सुरू केले होते. या भागात कन्नमवार जलाशयाच्या पाण्याची सोय असल्याने नंतर त्यांनी भाजीपाला लागवड रब्बी हंगामात सुरू केली. त्यात कारले, वांगे, कोहळे, टोमॅटो हा भाजीपाला त्यांनी पिकविला. या कामी त्यांच्या पत्नी आशा यांचे मोलाचे योगदान त्यांना मिळाले. नीलगिरीची शेती सुरू केल्यानंतर २००९ मध्ये पहिल्या वर्षी कन्नमवार जलाशयाच्या पाण्यावर आईल इंजिनने तीन वेळा वाफ्यांना पाणी त्यांनी दिले. मे २०१४ मध्ये नीलगिरीच्या झाडांची पूर्ण वाढ झाली. झाडे कापणी योग्य आकाराची झाल्यावर व्यापारी मंगर यांच्याकडे येऊ लागले. व्यापाऱ्यांनी ५ हजार ७५० रूपये प्रती टन भाव शेतातच देऊन झाडांची तोडणी करण्याचे ठरविले. १२० टन नीलगिरी लाकडाचे उत्पादन तीन एकर शेतीतून मंगर यांनी घेतले. त्यांना ५ लाख ४० हजार रूपयाचा निव्वळ नफा या शेतीतून झाला. प्रती वर्षाचा विचार करता, ३६ हजार रूपयाचा नफा मंगर यांनी कमविला. मंगर यांची ही शेती पाहून परिसरातील १० शेतकऱ्यांनीही नीलगिरी शेतीचा प्रयोग आपल्या भागात सुरू केला आहे. २०१४ मध्ये उत्पादन घेतल्यानंतर तीन एकरामध्ये खोडवा घेण्यात येत आहे. खरीप हंगामामध्ये नीलगिरीच्या शेतात आंतरपीक म्हणून भात घेतला. ५ क्विंटल उत्पादन झाले.
धानाच्या गावात नीलगिरी शेतीचा प्रयोग
By admin | Updated: February 9, 2015 23:13 IST