भाडभिडी : चामोर्शी तालुक्यातील हळदवाही टोला व हळदवाही या दोन गावांना विद्युत पुरवठा करण्याकरीता हळदवाही टोला-हळदवाही बायपास मार्गावर विद्युत जनित्र बसविण्यात आले आहे. मात्र सदर जनित्र रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात असल्याने पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचून राहते. जनित्राच्या सभोवताल कचऱ्याचेही साम्राज्य आहे. त्यामुळे जनित्राच्या ठिकाणी मुरूम टाकण्याची मागणी गावकऱ्यांनी अनेकदा ग्रा. पं. प्रशासनाकडे केली. मात्र ग्रा. पं. ने नेहमीच दुर्लक्ष केले. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात विद्युत जनित्राची दुरूस्ती करतांना अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.हळदवाही टोला-हळदवाही बायपास मार्गावर रस्त्याच्या बाजुला विद्युत जनित्र बसविण्यात आले आहे. परंतु जनित्राच्या सभोवताल बेशरमची झाडे आहेत. जनित्रात झालेला बिघाड दुरूस्ती करतांना अनेकदा रात्रीच्या सुमारास कर्मचाऱ्यांना यावे लागते. जनित्राच्या सभोवताल पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचून राहत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र जनित्राच्या सभोवताल असलेल्या खड्ड्यात मुरूम टाकण्याकडे ग्रा. पं. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रा. पं. प्रशासनातर्फे नाल्यांचा उपसा केलेला गाळ जनित्रानजीक आणण्यात आला. परंतु जनित्राच्या जवळ ट्रॅक्टर जात नसल्याने आणलेला गाळ रस्त्याच्या कडेला तसाच टाकून देण्यात आला. या घटनेला एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. तरीही रस्त्याच्या जवळ टाकलेला गाळ जनित्राच्या ठिकाणी टाकण्याचे शहाणपण ग्रा. पं. प्रशासनाला अजूनपर्यंत आले नाही.विद्युत जनित्राच्या सभोवताल खड्डे तर आहेतच शिवाय झाडे-झुडूपेही आहेत. जनित्रालगतच बेशरमची झाडे असल्याने अनेकदा रात्रीच्या सुमारास विद्युत कर्मचाऱ्यांना वीज दुरूस्ती करतांना अडचण निर्माण होत आहे. विद्युत जनित्र एका बाजुने खोलगट भागात असल्याने नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी साचलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात जनित्राभोवती खड्डे पडून आणखी पाणी साचण्याची शक्यता आहे. विद्युत प्रवाह प्रवाहीत होऊन वीज दुरूस्ती करतांना जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक वर्षापासून मुरूम टाकण्याची मागणी होत आहे. परंतु ग्रा. पं. चे दुर्लक्ष आहे. (वार्ताहर)
हळदवाहीचे जनित्र पाण्यात
By admin | Updated: July 16, 2014 00:12 IST