एटापल्ली : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे घोटसूर येथील माजी मालगुजारी तलाव फुटला. यामुळे गावात जाणारा रस्ता पूर्णत: वाहून गेला. रस्ता बांधण्याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे वर्षभरापासून घोटसूरवासीयांना गावात जाण्यासाठी रस्ताच उरला नाही. यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. गतवर्षीच्या दमदार पावसामुळे घोटसूरचा तलाव फुटला. यामुळे तलावालगतचा गावात जाणारा रस्ता पाण्याने वाहून गेला. वर्षभरापासून या रस्त्याची दुरूस्ती करण्यात न आल्याने गावातील नागरिक या मार्गावर लाकडे टाकून जीवघेणा प्रवास करीत आहेत. घोटसूर हे गाव कसनसूरवरून १ किमी अंतरावर आहे. घोटसूरवरूनच मानेवाडा, गुंजम, भुमकान, कारका (बु.) आदी गावांना जावे लागते. कसनसूरवरून घोटसूरला जाण्याकरीता मार्ग कच्च्या स्वरूपाचा आहे. मागील वर्षी तलाव फुटून रस्ता वाहून गेल्याने गावकऱ्यांपुढे दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तलावापासून घोटसूर गाव १ किमी अंतरावर आहे. उन्हाळ्यामध्ये घोटसूरला जाणे शक्य होते. मात्र यंदाच्या पावसाळ्यात या गावात मोठे जीकरीचे झाले आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी घोटसूरवासीयांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
घोटसूरवासीयांना जाण्यासाठी मार्गच नाही
By admin | Updated: September 20, 2014 23:49 IST