अभिनय खोपडे - गडचिरोलीलोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेवराव उसेंडी स्वत: आमदार असतानाही ६९ हजारांनी मागे राहिले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गडचिरोली क्षेत्रात काँग्रेसची कसोटी लागणार आहे. अवघ्या तीन महिन्यात ६९ हजार मतांची माघार भरून काढायची कशी, हा प्रश्न आमदारासह काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनाही आहे. २00९ मध्ये लोकसभा निवडणुकीत गडचिरोली मतदार संघात भाजपला केवळ १७0३ मतांची आघाडी होती. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ९६0 मतांनी विजयी झाली होती. यंदा मात्र उमेदवार स्वत: या मतदार संघाचे असूनही लोकसभा निवडणुकीत ६९ हजाराचा फटका आहे. या मतदार संघात गेल्या साडेचार वर्षात अनेक विकासकामे झालीत. स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती झाली, गडचिरोली मुख्यालयात १00 खाटांच्या स्त्री रूग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. एसटी महामंडळ व मुख्य वनसंरक्षक कार्यालय, बांधकाम विभागाचे मंडळ कार्यालय गडचिरोलीत सुरू झाले. चिचडोह बॅरेज या मोठय़ा उपसा सिंचन योजनेचे कामही प्रगतीपथावर आहे. तसेच कोटगल बॅरेज, हलदीपुरानी उपसा सिंचन योजना आदी मंजूर झाल्या आहेत. याशिवाय पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात अनेक विकास कामांना निधी मंजूर केला आहे. मात्र या कोणत्याही कामाचे काँग्रेस पक्षाच्या आमदारांना o्रेय घेता आलेले नाही. हे काम लोकापर्यंत पोहोचविण्यात लोकप्रतिनिधी आमदार व काँग्रेस पक्षही प्रचंड पिछाडीवर आहे. काँग्रेसचे आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी हे स्वत: हायप्रोफाईल आमदार असल्याच्या तोर्यात वावरत असल्यामुळे सर्वसामान्य लोक त्यांच्यापर्यंत जात नाही. गावपातळीपर्यंत त्यांचा संपर्क गावपुढार्यांशीच आहे. काँग्रेसचे जुने कार्यकर्ते तुटले असून नव्या ठेकेदारी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी आता आमदाराजवळील हितचिंतक म्हणून व काँग्रेस पक्षावर ताबा मिळविला आहे. त्यामुळे काँग्रेससमोरच्या अडचणी वाढतच आहेत. लोकहिताचे काम शासनाकडून करवून घेण्याऐवजी वैयक्तिक स्वरूपाचे काम करवून आणण्यावर आमदारांचाही भर आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तोकडी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका गटाशी आमदारांचे वैमनस्य आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून आपल्या कन्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भाग्यo्री आत्राम यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. त्या याच मतदार संघातील चामोर्शी-फराडा पंचायत समिती क्षेत्राच्या सदस्य आहेत. या मतदार संघात काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे यांचाही एक गट आहे. कोवासे यांना पक्षाने लोकसभेची उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारांमध्ये सहानुभूती आहे. लोकसभा निवडणुकीत उसेंडींना बसलेला ६९ हजार मतांचा फटका पाहू जाता कोवासे सर्मथकांनी विधानसभा निवडणुकीत साहेबांना तिकीट द्या असा प्रचार सुरू केला आहे. या मतदार संघात भाजपकडे उमेदवार म्हणून डॉ. देवराव होळी, प्रकाश गेडाम यांचे नाव चर्चेत आहे. तर युवाशक्ती आघाडीकडूनही एक तगडा उमेदवार मैदानात उतरविला जाण्याची शक्यता आहे. या मतदार संघात युवाशक्ती आघाडीचे काम गडचिरोली नगर पालिकेचे गट नेते प्रा. राजेश कातट्रवार पाहत आहेत. भाजपच्या मदतीने युवाशक्तीचा उमेदवार रिंगणात ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत. याशिवाय बहुजन समाज पार्टीही या मतदार संघात उमेदवार उतरवू शकते. सद्य:स्थितीत काँग्रेसची परिस्थिती या मतदार संघात हलाखीचीच आहे. विद्यमान आमदार डॉ. उसेंडी यांना उमेदवारी दिल्यास पक्षाला जिवापाड मेहनत करावी लागणार आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या चामोर्शी तालुक्यात ९ जिल्हा परिषद सदस्यांपैकी एकही सदस्य काँग्रेसचा नाही. धानोरा तालुक्यात पाचही जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे आहे तर गडचिरोलीत ५ पैकी २ सदस्य काँग्रेसचे आहेत व दोन अपक्ष व एक युवाशक्ती आघाडीचा आहे. त्यामुळे काँग्रेसला विधानसभेची लढाई कठीणच आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेससाठी कसोटीच
By admin | Updated: June 8, 2014 23:52 IST