गडचिरोली : मागील २५ दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उकाड्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असल्याने पंखा, कुलर, एसी, फ्रिज आदी साधनांसाठी विजेचा वापर वाढला आहे. त्याचबरोबर शेतकरीवर्ग पीक वाचविण्याची धडपड करीत आहे. रात्रंदिवस मोटारपंप सुरू करून पिकांना पाणी देण्याचे काम सुरू केले आहे. मागील पाच दिवसांत विजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. विजेचा पुरवठा मात्र वाढविणे अशक्य असल्याने विजेची मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ जुडविण्याच्या उद्देशाने विज वितरण कंपनीने भारनियमन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अर्धा तास ते अडीच तासापर्यंतचे भारनियमन केले जात आहे. सदर भारनियमन अस्थायी आहे. पावसाला सुरूवात होताच भारनियमन रद्द केले जाणार असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (नगर प्रतिनिधी)
जिल्ह्यात अस्थायी भारनियमन
By admin | Updated: July 15, 2015 01:35 IST