देसाईगंज : पेपरलेस कामकाज वाढविण्याच्या दृष्टीने शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील तलाठ्यांना लॅपटॉप किंवा संगणक पुरविले़ मात्र संगणक निरक्षरतेमुळे जिल्ह्यातील ३० टक्के तलाठी संगणक, लॅपटॉप हाताळण्यात असमर्थ आहेत़ शासकीय खर्चातून मिळालेला संगणक मात्र तलाठ्यांच्या घराची शोभा वाढवित आहेत. मात्र याकडे महसूल व सबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे़सातबारा, नमुना आठ किंवा गावातील इतर बाबींची माहिती कळ दाबताच डोळ्यासमोर आली पाहिजे़ यादृष्टीने शासनाने राज्यभरातील तलाठ्यांना शासकीय खर्चातून संगणक किंवा लॅपटॉप पुरविले़ तलाठ्यांनी मोठ्या हिंमतीने लॅपटॉप आपल्या ताब्यात देखील घेतले. मात्र जिल्ह्यातील तीस टक्के तलाठ्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान देखील नसल्यामुळे शासकीय अनुदानातून मिळालेले लॅपटॉप तलाठ्यांच्या घरांची शोभा वाढवित आहेत.़ संगणकाचे प्राथमिक ज्ञान नसणारे तलाठी शासनाकडून घेतल्या जाणारी एमएससीआयटी ही परीक्षा मात्र उत्तीर्ण आहेत़ याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे़ अनेक तलाठ्यांनी शासकीय लॉपटॉप आपल्या पाल्यांना दिले आहेत़. देसाईगंज तालुक्यात तर केवळ दोन तलाठी संगणक हाताळून आपला कार्यभार चालवित आहेत़. तलाठ्यांच्या संगणक निरक्षरतेमुळे साधा सात-बारा उतारा हातोहाती तयार करावा लागत आहे़ मात्र याकडे महसूल विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी साधे लक्ष देण्याची तसदीसुध्दा घेतलेली नाही़ आधुनिक युगात संगणक साक्षरता अतिशय आवश्यक आहे़. दैनंदिन व्यवहारात संगणकाचे काम पडते़ त्याकरिता शासनानेदेखील कोट्यवधींचा खर्च करून तलाठ्यांना संगणक पुरविले आहेत़ दैनंदिन कामकाजातील स्टेशनरीच्या खर्चावर यामुळे आळा बसावा तसेच शासकीय कामे पेपरलेस पध्दीने जलद होण्याकरिता शासनाने ही योजना कार्यान्वीत केली होती़ संगणकाचा पुरवठा होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे़ अनेक तलाठी कार्यालयात संगणक पोहोचले आहेत. तर अनेक कार्यालयांना संगणकाची अद्यापही प्रतीक्षा आहे. तलाठी कार्यातील काम तीव्र गतीने चालावे, या उद्देशाने संगणक पुरविण्यात आले आहेत. मात्र शासकीय स्तरावर एमएससीआयटीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तलाठ्यांनी स्वत:च्या कार्यालयातून लॅपटॉपला हद्दपार केले आहे. (वार्ताहर)
लॅपटॉपमध्ये तलाठी नापास
By admin | Updated: December 29, 2014 23:43 IST