दुर्वेश सोनवने यांचे प्रतिपादन : अवयवदानाबाबत जनजागृती चर्चासत्रगडचिरोली : आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आज मानवाने विज्ञानाच्या आधाराने प्रगतीचा उच्चांक गाठला आहे. मात्र वातावरण, जीवन जगण्याची पद्धती, आहार यासह विविध कारणांमुळे माणूस विविध आजारांनी ग्रासला आहे. तेव्हा समाजातील विविध आजारांनी त्रस्त अशा रुग्णांना नवजीवन देण्याच्या उद्देशाने एक पाऊल प्रत्येकांनी पुढे टाकण्याची गरज आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी केले.महाअवयवदान संदर्भात जनमाणसांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषांगाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. याप्रसंगी मंचावर जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. किरण मडावी, डॉ. प्रवीण किलनाके, डॉ. वानखेडे, डॉ. शेंद्रे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मेश्राम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, तहसीलदार भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नेत्रतज्ज्ञ डॉ. किरण मडावी म्हणाले, अवयवदान करणे हे अत्यंत चांगली गोष्ट असून ही आता काळाची गरज झाली आहे. आपल्या शरीरात असलेले अनमोल अवयव मृत्यूनंतरच्या संस्कारात नष्ट होतात. तेव्हा ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ या म्हणीनुसार आपल्या अवयवांना जीवंत ठेवावयाचे असेल तर दान करून सात जणांना जगण्याची आशा निर्माण करू शकता. भारत देशात ४० लाख दृष्टीहीन रुग्ण आहेत. मात्र वर्षाकाठी फक्त ३५ हजार व्यक्ती नेत्रदान करतात. त्यामुळे दृष्टीहीनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही तथाफवत दूर करण्यासाठी सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)
रुग्णांना नवजीवन देण्यासाठी पुढाकार घ्या
By admin | Updated: September 1, 2016 01:40 IST