चामोर्शी गावात : दुरूस्ती कामासाठी जि. प. सिंचन विभागाला दिले आदेशचामोर्शी : स्थानिक चामोर्शी शहराला लागून असलेल्या पाळ फुटलेल्या गावतलावाची तहसीलदार यू. जी. वैद्य यांनी पाहणी करून पाळ दुरूस्ती, मातीकाम तसेच पाळ बांधकाम करण्याबाबत उपविभागीय अभियंता जि. प. सिंचन विभाग यांना तहसीलदारांनी निर्देश दिले. यावेळी तहसीलदार वैद्य यांच्यासमावेत गजानन भांडेकर, राहुल नैताम, नुरेश नैताम, बाबाजी चलाख, प्रमोद दुधबळे आदी उपस्थित होते. येथील गाव तलावाच्या पाळीने आठमाही गाळदान असून कास्तरवर्ग शेताकडे जाणे-येणे करतात. परंतु सदर तलावाची पाळ फुटल्यामुळे शेताकडे रोवणीच्या हंगामाकरिता जाणे-येणे करण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते आणि तलावाची पाळ फुटल्यामुळे गावात पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच धानाची शेतीसुद्धा बुडून राहू शकते. या परिसरात अंदाजे २०० ते २५० एकर शेतजमीन पाण्याखाली डुबून राहण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांनी तहसीलदारांना १६ जून रोजी निवेदन देऊन समस्या सांगितली होती व तलावाच्या पाळीची दुरूस्ती करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर तहसीलदारांनी उपविभागीय सिंचन अधिकारी चामोर्शी यांना सांगितले. परंतु या कार्यालयाने दुर्लक्ष केले. तहसीलदारांना निवेदन देताना शेतकरी आनंदराव सोनटक्के, गजानन भांडेकर, नीलकंठ दुधबळे, ढिवरू चलाख, दुर्योधन चलाख, सुरेश चलाख, इंद्रजीत पिपरे, दिवाकर चलाख, नीलेश सोनटक्के, रामजी चलाख, आनंदराव भांडेकर आदी उपस्थित होते. बुधवारी तहसीलदार यू. जी. वैद्य यांनी प्रत्यक्ष तलावाची पाहणी करून उपविभागीय सिंचन अधिकाऱ्यास फुटलेली पाळ दुरूस्त करून देण्याबाबत निर्देश दिले. रोवणी हंगाम सुरू होण्याच्याआधी तलावाची फुटलेली पाळ दुरूस्ती व मातीकाम करण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पावसाळ्यापूर्वी ही पाळ दुरूस्त झाल्यास हानी टळेल. अन्यथा शेतकऱ्यांची अडचण वाढणार आहे. (शहर प्रतिनिधी)
पाळ फुटलेल्या गावतलावाची तहसीलदारांकडून पाहणी
By admin | Updated: July 9, 2015 01:54 IST