बामणी : शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांकडे वन विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज गुरूवारी शेकडो शेतकऱ्यांनी तालुक्यातील बामणी येथील वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्त्व सिरोंचाचे माजी पं. स. सदस्य समय्या कुळमेथे, राकाँचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मल्लीकार्जुन आकुला, युवा अध्यक्ष सतिश भोगे, सामाजिक कार्यकर्ते रंजीत ओल्लालवार, तीरूपती चिट्याला, अशोक दुर्गम यांनी केले. शेकडो शेतकरी व शेतमजुरांचा मोर्चा दुपारी १२ वाजता बामणी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या परिसरातून वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी मागण्यांबाबत चर्चा केली. त्यानंतर वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात शेतकऱ्यांसाठी मजगीच्या निर्मितीचे व मजगी दुरूस्तीचे कामे सुरू करण्यात यावे, रोजगार निर्मितीसाठी नाल्यावर सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरू करावे, वन तलाव व वनोत्तर तलावाच्या दुरूस्तीचे काम सुरू करावे, जेणे करून महिला बचतगटांना मत्स्य व्यवसाय उपलब्ध होईल व जंगलातील प्राण्यांना पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत निर्माण होईल. पीआयए कामाचा परत गेलेला निधी पुन्हा मिळवून काम सुरू करण्यात यावे, आयपी अंतर्गत महिला बचतगटांना उद्योगासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, नव्या पीएलएची नियुक्ती करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.सन २०१३ ला आलेल्या मुसळधार पावसामुळे बामणीजवळील नाल्याला पूर आल्याने नाल्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या १०० एकरातील धान पिकाची रोवणी पुरात वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या भागात एकात्मिक पाणलोट विकास योजना कार्यान्वित करून मजगीचे कामे करावीत, तसेच शेतात साचलेला रेतीचा उपसा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशीही मागणी चर्चेदरम्यान शेतकऱ्यांनी केली. या आंदोलनात सिरोंचा तालुक्यातील बामणी परिसरातील पाच ते सहा गावातील शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्याय देण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)
वन खात्याकडून कामे सुरू करा
By admin | Updated: February 13, 2015 01:44 IST