बेरोजगारांची मागणी : उमेदवार लागले तयारीलागडचिरोली : जिल्ह्यात उद्योगधंद्याच्या कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. उच्च शिक्षीत बेरोजगाराची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बारावीनंतर पदवी व पदव्युत्तरचे शिक्षण घेऊन युवक मेटाकुटीस आले आहे. सर्वात अधिक संधीचे क्षेत्र म्हणून पोलीस विभागाकडे बघितले जाते. त्यामुळे शासनाने गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करावी, अशी मागणी जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांकडून होत आहे. शासनाच्या मंजुरीनंतर जिल्हा पोलीस विभागामार्फत जिल्ह्यात दरवर्षी पोलीस भरतीची प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र यंदा विधानसभा व लोकसभा निवडणूक आल्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर गेली. जिल्ह्यातील शेकडो सुशिक्षीत बेरोजगार पोलीस भरतीत स्थान मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शारीरिक कसरती करून पराकाष्टा करीत आहेत. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने पोलीस भरतीत उतरणाऱ्या भावी युवकांचे प्रयत्न अधिकच वाढले आहेत. याशिवाय बेरोजगार युवक पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी अभ्यासही वाढविला असल्याचे दिसून येते. राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलीस भरती करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पोलीस विभागाने शासनाकडे पाठपुरावा करून गडचिरोली जिल्ह्यात लवकर पोलीस भरती प्रक्रिया राबवून बेरोजगार युवकांना न्याय द्यावा तसेच पोलीस भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी सुशिक्षीत बेरोजगार संघटनेच्यावतीने होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू करा
By admin | Updated: December 13, 2014 22:38 IST