धाईत यांचे प्रदेशाध्यक्षांना निवेदन : जिल्हाध्यक्षांना बडतर्फ करागडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा गटातटाच्या राजकारणात शीतयुध्द सुरू झाले आहे. पक्षाच्या दारूण पराभवानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांना पक्षातून बडतर्फ करावे, अशी मागणी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्याम वासुदेव धाईत यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. तटकरे यांना पाठविलेल्या पत्रात धाईत यांनी म्हटले आहे की, पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाचे ध्येय, धोरणाला तिलांजली दिल्यामुळे जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीत तिनही मतदार संघामध्ये पक्षाला पराभव पत्करावा लागला. दोन क्षेत्रामध्ये पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कमही वाचू शकली नाही. याची सर्वस्वी जबाबदारी घेऊन धर्मरावबाबा आत्राम यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा, मात्र अद्याप त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करावे, अशी मागणीही धाईत यांनी केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम हे अहेरी क्षेत्रातून उभे होते. पक्ष कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे पक्षाचा पराभव येथे झाला तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून त्यांनी आपली कन्या भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांचीही अनामत रक्कम जप्त झाली. आरमोरी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाकडे सुरूवातीला उमेदवारी मागणारे सेवानिवृत्त सनदी अधिकारी एन. बी. वटी यांना वेळेवर उमेदवारी देण्यात आली. या भागातील कोणत्याही पक्ष कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता ही उमेदवारी कशी देण्यात आली, हाही स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. त्यामुळेच वटी यांना केवळ २८०० मते मिळून त्यांचीही अनामत जप्त झाली. पक्षाकडून आरमोरी विधानसभा क्षेत्रातील उमेदवाराला प्रचार साहित्यही देण्यात आले नाही, असे धाईत यांनी या पत्रात म्हटले आहे. पराभवानंतर पक्ष कार्यकर्ते पूर्णत: पोरके झाले असून स्थानिकस्तरावर कोणताही संवाद पक्ष नेतृत्वाचा राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना बडतर्फ करून माजी अध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांना अधिकार सोपविण्यात यावे, अशी मागणीही धाईत यांनी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडे केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
राकाँत पुन्हा शीतयुध्द सुरू
By admin | Updated: November 23, 2014 23:19 IST