गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींना हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा व ते आत्मनिर्भर व्हावेत, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने गडचिरोली जिल्ह्यात गती प्रकल्प सुरु केला आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील दोन महिलांसह ३८ जणांना प्रशासनाने वाहतुकीसाठी काळी-पिवळी टॅक्सी उपलब्ध करून दिली आहे. प्रशासनाच्या या अभिनव प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना वाहतुकीस मदत होणार आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १४ हजार ४१२ चौ.कि.मी असून यापैकी जवळपास ७८ टक्के क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. जिल्ह्यातील ८९ टक्के नागरिकांचे वास्तव्य ग्रामीण भागात असल्याने वाहतुकीच्या सोयीसुविधा या जिल्ह्यात जेमतेम आहेत. यावर मात करण्यासाठी तसेच अतिदुर्गम भागातील नागरिकांना वाहतुकीची सोय उपलब्ध होण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि बँक आॅफ इंडिया यांच्या समन्वयातून ३८ आदिवासी युवक-युवतींना वाहतुकीसाठी काळी-पिवळी टॅक्सीचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी अतिदुर्गम भागातील आदिवासी व सामाजिकदृष्टया मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच या लाभार्थ्यांना बाजार भावापेक्षा तब्बल एक ते दीड लक्ष रुपये कमी किमतीत या गाड्या देण्यात आल्या आहेत. यात सर्वाधिक ११ लाभार्थी सिरोंचा तालुक्यातील असून धानोरा आणि एटापल्ली तालुक्यातील प्रत्येकी ७ लाभार्थी, कोरची आणि कुरखेडा तालुक्यातील प्रत्येकी ४ लाभार्थी, अहेरी तालुक्यातील दोन लाभार्थी तर मुलचेरा, भामरागड आणि आरमोरी तालुक्यातील प्रत्येकी एका लाभार्थ्यांचा समावेश आहे.शासनाने विशेष बाब म्हणून गडचिरोली जिल्ह्यासाठी एक हजार वाहतूक परवाने मंजूर केले आहे. निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत वाहनचालक प्रशिक्षक देण्यात आले. उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत लाभार्थ्यांना वाहन परमीट, वाहन चालक परवाना व दरपत्रक उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रत्येक लाभाथ्यार्ला किमतीच्या ५० टक्के वित्तीय सहाय्य अनुदान स्वरुपात पुरविण्यात आले. तर लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान व लाभार्थी हिस्सा वगळता वाहनासाठी लागणारी उर्वरीत रक्कम जिल्हा अग्रणी बँक असलेल्या बँक आॅफ इंडियामार्फत तब्बल अडीच टक्के कमी व्याज दराने मंजूर करण्यात आली आहे. बँकेमार्फत वाहन कजार्चा दर सद्यस्थितीत १२.७५ टक्के असून या प्रकल्पासाठी विशेष बाब म्हणून बँकेने १०.२५ टक्के व्याज मंजूर केले आहे. या प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात २०, दुस-या टप्प्यात १० आणि तिसऱ्या टप्प्यात ८ अशा एकूण ३८ गाड्यांचे वाटप करण्यात आले असून १३० लाभार्थ्यांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. लाभार्थ्यांना देण्यात आलेली सुमो गोल्ड या गाडीची खुल्या बाजारातील किंमत ६ लक्ष २५ हजार असून गडचिरोलीतील गति प्रकल्पासाठी सदर गाडी ५ लक्ष ११ हजार रुपयांत तर गॅमा फोर्स ही ७ लक्ष रुपये किमतीची गाडी लाभार्थ्यांना ६ लक्ष ११ हजार रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे लाभार्थ्यांना कजार्चा हप्ता सुध्दा जास्तीत जास्त ४ हजार ७०० रुपयांपर्यंतच ठेवण्यात आला आहे. दिवसाला जवळपास २०० कि.मी धावणा-या या गाड्यांच्या वाहतुकीतून चालक आणि क्लिनरला १२ ते १५ हजार रुपये प्रतिमाह मिळकत होत आहे. गडचिरोलीत शासकीय वाहतूक व्यवस्थेला नक्षली नेहमी विरोध करतात. त्यामुळे आदिवासी नागरिकांना फार मनस्ताप सहन करावा लागतो. गती प्रकल्पाने ही उणीव भरून काढली असून एकप्रकारे आदिवासी नागरिकांच्या जीवनाला जिल्हा प्रशासनामुळे गती प्राप्त झाल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)
दुर्गम भागातील वाहतुकीला ‘गती’
By admin | Updated: December 11, 2014 23:07 IST