सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पालिकेने शहरातील प्रभागासह रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांमध्ये सॅनिटायझर फवारणी करावी. नागरिकांना स्वच्छ व नियोजित पाणीपुरवठा करावा. सार्वजनिक विहिरी, हातपंपांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकावे. नगरपालिकेने उभारणी केलेल्या सौरऊर्जा लघुपाणी पुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात, उन्हाळा असल्याने सगळीकडे पाण्याची पातळी खालावली आहे. विहिरी व हातपंपातीलही पाण्याची पातळी कमी झाली आहे. काही बोअरवेलमधून लाल पाणी येत आहे. अशा हातपंपांची दुरुस्ती करून गाळ काढावा व खाेली वाढवावी. नियमित पाणीपुरवठा करावा. वातावरणाच्या बदलाने नेहमी नदीवरील पाणीपुरवठा जॅकवेलवरील लाईट वारंवार जात असल्याने, पाण्याची टाकी पूर्णपणे भरत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा नेहमी खंडित होताे. त्याकरिता लवकर जॅकवेलवरील विहिरीवर सोलर पंप बसवावे. त्याचप्रमाणे फिल्टरवरसुद्धा साैरपंप बसवून नियमित पाणीपुरवठा करावा. पाणीटंचाई असलेल्या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा व पाण्याची अडचण दूर करावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश हाेता. मिलिंद खाेब्रागडे यांनी मुख्याधिकाऱ्यांसाेबत शहरातील समस्यांवर चर्चा करीत त्या मार्गी लावण्याची मागणी केली. जनतेने आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहनही खाेब्रागडे यांनी केले आहे.
आरमाेरी नगरपरिषद क्षेत्रातील समस्या साेडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:34 IST