आनंद मांडवे - सिरोंचाब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची निगा राखण्यात प्रशासनाला आत्मीयता नसल्याने ती पडझड होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या वास्तूचे नवन्ीाीकरण करून ऐतिहासिक मूल्याचे जतन करावे, अशी तालुकावासीयांची मागणी आहे.हवामान खात्याचे कार्यालय उपराजधानी नागपूर येथे असले तरी या खात्याचा कोणीच कर्मचारी सिरोंचा येथे कार्यरत नाही. इंग्रजांच्या राजवटीत या भागातील हवामानाचा संभाव्य अंदाज व पर्जन्या (पावसा) चे मोजमाप करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था होती. स्वातंत्र्य काळातही बरीच वर्षे नित्यनेमाने हे कार्य सुरू होते. २०-२५ वर्षांपूर्वीपर्यंत स्थानिक महसूल विभागाकडून पर्जन्याची आकडेवारी वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात येत असे. या कामासाठी लिपिकवर्गीय कर्मचारी तैनात असायचा. स्वत:च्या दैनंदिन व नियमित सेवाकार्यसूचीसह सदर काम त्याकडे सोपविले असायचे. त्या अतिरिक्त कामाचा मोबदला त्याला मिळत असे. कामाचे देयक स्थानिक तहसीलदाराच्या शेऱ्याने नागपूरच्या हवामान खात्याला पाठविले जायचे. तिकडून मंजुरी आल्यावरच संबंधित मेहनताना कर्मचाऱ्याला अदा करण्यात येत असे. मेहनतान्याची रक्कम मिळण्यास सहा ते आठ महिने लागले तरी एक कर्तव्य म्हणून या कामाकडे कर्मचारी पाहायचा. मात्र कालांतराने या विषयीची उदात्त भावना लोप पावली. शिवाय नागपूर स्थित हवामान खात्याच्या कार्यालयालाही अशी एक वास्तू महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर अद्यापही गतवैभव टिकवून असल्याचे विस्मरण झाले. तहसील कार्यालयामागे ध्वजस्तंभाजवळ सिरोंचा-आलापल्ली या प्रमुख जिल्हा मार्गाच्या कडेला ही सुरेख वास्तू असून तिच्या लाकडी पायऱ्या जीर्ण झाल्या आहेत. एकमेव सागवानी दाराची मोडतोड झाली असून ते गाढवांचे व मोकाट जनावरांचे आश्रयस्थान झाले आहे. कधी-कधी हौशी युवक व लहान मुले या इमारतीवर चढण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा बुजूर्ग मंडळी त्यांना चढू देत नाही. कधी डोळा चुकवून काही मुले चढलीच तर फार मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सन १९१०-११ मध्ये ११ हजार ३३८ रूपये खर्चून सिरोंचा येथे बांधण्यात आलेल्या विश्रामगृह इमारतीचे नवीनीकरण अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेल्या बऱ्याच इमारतींनी १००, किंबहुना अधिक काळ पूर्ण केला आहे. त्यामुळे ती पाडून टाकण्याबाबतची (डिसमेंटल) ब्रिटिश सरकारची पत्रे भारत सरकारला येत असतात. मात्र १००, १५० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी केलेल्या बांधकामांचा दर्जा एवढा सुसंगत व गुणवत्तापूर्ण आहे की, या इमारती अद्यापही अभेद्य आहेत. सिरोंचा तालुक्याच्या बामणी, सोमनपल्ली, कोप्पेला या आदिवासी गावांसह बऱ्याच ठिकाणी विश्रामगृहे असून बामणीच्या विश्रामगृहात सध्या टेकडाताल्ला पोलीस ठाणे थाटले आहे. सोमनपल्लीच्या विश्रामगृहाची मानवनिर्मित पडझड झाली आहे. तर कोपेल्ला येथील सुप्रसिध्द विश्रामगृहाची समाजकंटकांनी २३ मार्च २००९ रोजी जाळपोळ केली. असे असले तरी ब्रिटिशकालीन विटांची उत्कृष्ट जुडाई तत्कालीन प्रामाणिक बांधकामाची साक्ष देत आहे. या विश्रामगृहात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनीही बऱ्याचदा मुक्काम ठोकला होता, असे जुने जाणकार सांगतात. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या इमारतींचेही जतन होण्याची गरज सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सिरोंचा येथील पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था
By admin | Updated: September 22, 2014 23:18 IST