कार्यकारी अभियंत्यांना निवेदन : युवकांनी घेतला पुढाकारअहेरी : शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने त्रस्त झालेल्या युवकांनी आलापल्ली येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता बी. ए. हिवरकर यांची भेट घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. तसेच अनेक वीज खांब दुरवस्थेत असल्याने त्यांची दुरूस्तीही करण्याची मागणी युवकांकडून कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अहेरी शहरातील वॉर्ड क्रमांक १ मधील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. सध्या पावसाळ्याच्या दिवस असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी यापूर्वीही निवेदनाद्वारे करण्यात आली होती. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वॉर्ड क्रमांक गेलेले तिन्ही फेज ओव्हरलोड असल्याने ट्रॉन्सफार्मरवरही दाब पडत आहे. त्यामुळे यावर पर्यायी व्यवस्था करण्यासाठी वीज वितरण विभाग प्रयत्न करीत असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. सदर समस्येला दोन वर्षाहून अधिक कालावधी उलटला असून समस्या ‘जैसे थे’ च आहे. याबरोबरच वॉर्ड क्रमांक ३ मधील अनेक घरावरून विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा लोंबकळत असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सदर तारा ताणण्यात याव्या, अशी मागणी शंकर मगडीवार, पप्पू मद्दिवार, विवेक बेझलवार, रंगय्या रेपाकवार, गुड्डू ठाकरे, नूर महम्मद शेख, मिलींद खोंड यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
अहेरीतील वॉर्डांचा विद्युत पुरवठा सुरळीत करा
By admin | Updated: July 25, 2015 01:55 IST