लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तेलंगणा राज्यात रोजगारासाठी गेलेले १४ मजूर चोरट्या मार्गाने तालुक्यातील नंदीगाव येथे स्वत:च्या गावी दाखल झाले. या सर्व मजुरांना गावातील जिल्हा परिषद शाळेत निर्माण केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.नंदीगाव येथील ४ महिला व १० पुरूष मजूर तेलंगणा राज्यातील लक्ष्मीपूर येथे मिरची तोडण्यासाठी गेले होते. दरम्यान कोरोनामुळे केंद्र शासनाने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन हटेल, अशी अपेक्षा मजूरवर्ग बाळगून होता. मात्र केंद्र शासनाने लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविले आहे. लॉकडाऊन पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ही अडचण लक्षात घेऊन मजूर पायदळ गावाकडे आले. गावात पोहोचल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.राज्याच्या सीमांवरील मार्गांवर पोलीस चौक्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मार्गाने येणे अशक्य असल्याने काही नागरिक प्राणहिता, गोदावरी नदीचे पात्र ओलांडून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. यावर्षी दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी अधिक आहे. त्यामुळे नदीतून प्रवास करणे धोकादायक आहे. हा धोका पत्करून मजूर गाव गाठत आहेत.