गडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फतीने राबविण्यात येत असलेल्या महिला समृध्दी योजनेंतर्गत सुमारे ५४ हजार महिलांनी बँक खाते काढले असून या बँक खात्यामध्ये सुमारे २० कोटी रूपयांची बचतही करण्यात आली आहे. महिलांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असल्याने अनेक महिला स्वयंपूर्ण झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा ५० टक्के भाग नक्षलग्रस्त व अतिशय दुर्गम आहे. या भागातील बहुतांश नागरिकांकडे बँक खाते उपलब्ध नाही. परिणामी आर्थिक व्यवहार करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातही महिलांच्या नावाने बँक खात्यांची संख्या अत्यंत नगण्य होतील. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिला समृध्दी योजना १ सप्टेंबर २०१४ पासून सुरू केली. या योजनेंतर्गत महिलांचे बँक खाते काढण्यात येत आहेत. २० जूनपर्यंत सुमारे ५४ हजार महिलांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, बहुतांश ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांचे खाते उघडण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. या बँक खात्यामुळे ज्या महिलांनी आजपर्यंत बँकेची पायरी चढली नव्हती, त्या महिला आता स्वत:हून आर्थिक व्यवहार करू लागल्या आहेत. आर्थिक बचतीचे महत्त्व या महिलांना कळल्याने मजुरीचा काही भाग ते स्वत:हून बचत करीत आहेत. या बँक खात्यांमध्ये सुमारे २० कोटी रूपये बचत करण्यात आले आहेत. बँकेच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे महिलांची प्रगती होण्यास फार मोठी मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)बचतीच्या दुप्पट दिले जात आहे कर्ज ज्या महिलांच्या बँक खात्याला सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. अशा महिलांना कोणतेही तारण न घेता बँक खात्यातील बचतीच्या दुप्पट कर्ज दिल्या जात आहे. आजपर्यंत ५०० हून अधिक महिलांना कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. या कर्जाची परतफेड झाल्यानंतर तीन ते चारपट कर्ज दिले जाणार आहे. बँकेच्या कर्जावर अनेक महिलांनी स्वत:चा रोजगार सुरू केला आहे.
महिला समृध्दीने दाखविला बचतीचा मार्ग
By admin | Updated: June 29, 2015 01:59 IST