एस. पी. फासे यांचे प्रतिपादन : आरमोरी व आलापल्ली येथे रस्ता सुरक्षाविषयी मार्गदर्शनआरमोरी/ आलापल्ली : दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. अपघात एक समस्या बनत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशावेळी वाहतूक सुरक्षा बाळगणे आवश्यक आहे. ही सुरक्षा वाहतूक नियमांशिवाय अशक्य आहे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक सहाय्यक परिवहन अधिकारी एस. पी. फासे यांनी केले. आरमोरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून एस. पी. फासे बोलत होते. आलापल्ली येथीलही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रस्ता सुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आरमोरी येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा होते. यावेळी मोटार वाहन निरीक्षक प्र. प्र. इंगवले, पीएसआय एन. बी. बच्चलवार, उपप्राचार्य डॉ. रमेश ठोंबरे, प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. नोमेश मेश्राम, प्रवीण रहाटे उपस्थित होते. यावेळी इंगवले यांनी वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केले. संचालन प्रा. डॉ. विजय रैवतकर तर आभार प्रा. शशिकांत गेडाम यांनी मानले. किशोर हजारे, प्रा. राजेंद्र घोनमोडे, छगन मुंगमोडे, ज्ञानेश्वर ठाकरे, पराग मेश्राम, सीमा नागदेवे, मनोज ठवरे, जयेश पापडकर, टी. के. किरणापुरे, गौतम यांनी सहकार्य केले. आलापल्ली येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. आर. डोंगे होते. मार्गदर्शक म्हणून एआरटीओ एस. पी. फासे, प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश दुर्गे, रोमित तोंबर्लावार उपस्थित होते. वाहतूक सुरक्षा म्हणून वाहन चालविताना हेल्मेट, शीटबेल्टचा वापर करावा. मागील वर्षात जिल्ह्यात ११८ अपघात होऊन ११६ जणांना आपला जीव गमवावा लागला. देशात एका मिनीटात एक दुर्घटना घडत असून चार मिनीटात एका जणाचा मृत्यू होतो. त्यामुळे वाहतूक नियम पाळावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान डोंगे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला आयटीआयमधील निदेशक व प्रशिक्षणार्थी हजर होते. (वार्ताहर)
वाहतूक नियमांशिवाय रस्ता सुरक्षा अशक्य
By admin | Updated: January 23, 2016 01:40 IST