गडचिरोली : अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हा परिषदेसमोर हजारो अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले.जिल्हा परिषद व राज्य शासनाकडे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात अनेकदा निवेदन देण्यात आली. मात्र या मागण्यांकडे प्रशासनासह शासनाचे दुर्लक्ष होत आहे. शासन व प्रशासनाला जाग आणण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनात संतप्त अंगणवाडी महिला कर्मचारी घोषणाबाजी केली. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, लहान बालकांच्या नावाखाली खरेदी केलेल्या वस्तूच्या किंमतीकडे नजर टाकली, तर शासनकर्त्यांचे किती नैतिक अधपतन झाले, हे दिसून येते. भरमसाठ किंमत दर्शवून शासनाने अंगणवाडीतील साहित्य खरेदीत मोठा घोटाळा केला असल्याची टीका प्रा. दहिवडे यांनी केली. या आंदोलनाला कार्तिकस्वामी कोवे, गुरूप्रितसिंग, फकीरा ठेंगणे, डी. एस. वैद्य, अंकुश वाघमारे, ललीता केदार, संगीता वडलाकोंडावार, उज्ज्वला उंदीरवाडे, माया शेडमाके, रत्नमाला चालुरकर, माया येरमुरवार, आशा कोटांगळे, चंद्रकला कुंभारे, कौशल्या गौरकार, माया नैनुरवार आदींसह बहुसंख्य अंगणवाडी महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.सायंकाळच्या सुमारास जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे धरणे
By admin | Updated: July 14, 2015 02:07 IST