लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील २९१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केल्यानंतर गेल्या ५ मार्च रोजी ग्रामविकास विभागाने सरपंचांचे जिल्हानिहाय आरक्षण जाहीर केले. ग्रामविकास विभागाच्या या वरातीमागून घोडे हाकण्याच्या प्रकारानंतर जिल्हा प्रशासनाने चार दिवसांनी सरपंचांचे तालुकानिहाय आरक्षण जाहीर केले. आता गावनिहाय सरपंचांचे आरक्षण काढण्यासाठी तालुका प्रशासनाने बुधवार आणि गुरूवारचा मुहूर्त काढला आहे. आधीच उशिर, त्यात लागून आलेल्या सुट्यांमुळे सरपंचपदाच्या आरक्षणाचा बोजवारा उडाला आहे.नामांकन दाखल करण्यासाठी १३ मार्चपर्यंत मुदत आहे. ऐन वेळेवर म्हणजे काही तालुक्यात दि.११ ला तर काही तालुक्यात दि.१२ ला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी बाशिंग बांधून आपले पॅनल उभे करण्यासाठी सज्ज झालेल्या लोकांचा ऐनवेळी हिरमोड होण्याची शक्यता आहे. कोणत्या गावात सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी निघते हे पाहून त्यानुसार गावपुढारी आपले पॅनल उभे करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच आतापर्यंत नामांकन दाखल करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे.गावनिहाय सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करताना अनुसूचित जमाती क्षेत्रात सर्व सरपंच अनुसूचित जमातीकरिता (आदिवासी) राखीव आहेत. मात्र त्या क्षेत्राबाहेरील गावांसाठी अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्या किती आहे त्यावरून आरक्षण ठरेल. तर नामाप्र आण महिला राखीव सरपंचाची सोडत ईश्वर चिठ्ठीने होणार आहे. गडचिरोलीत दि.११ ला तर आरमोरीत दि.१२ ला ही सोडत काढली जाणार आहे.विशेष म्हणजे राखीव जागेसाठी उमेदवाराकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नसेल तर त्याचे नामांकन रद्द होऊ शकते. त्यामुळे इच्छुकांची जात पडताळणी कार्यालयाकडे धावपळ सुरू आहे.उरलेल्या तीन दिवसात उसळणार गर्दीमंगळवारी धुलीवंदनाची सुटी असल्यामुळे दि.११ ते १३ असे तीनच दिवस नामांकनासाठी शिल्लक आहेत. यामुळे या तीन दिवसात निवडणूक लढण्यास इच्छुक असणाºया उमेदवारांची नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी वाढणार आहे. त्यातही सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर दि.१२ आणि १३ ला सर्वाधिक गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडताना मोठी कसरत करावी लागणार आहे.सोमवारी ७९ नामांकन दाखलग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी १० तालुक्यांमध्ये एकूण ७९ नामांकन दाखल झाले. गडचिरोली तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायतमधील केवळ एका अनुसूचित जमातीच्या उमेदवाराने नामांकन दाखल केले. कोरची, धानोरा तालुक्यात एकाही उमेदवाराने नामांकन दाखल केले नाही. देसाईगंज तालुक्यातील आमगाव ग्रामपंचायतीसाठी ६, बोडधा २१ असे एकूण २७ नामांकन दाखल झाले आहेत. मुलचेरा तालुक्यात कालिनगर ग्रामपंचायतीसाठी एक नामांकन दाखल झाले आहे. अहेरी तालुक्यातील आलापल्ली ग्रामपंचायतीसाठी २४ नामांकन व नागेपल्ली ग्रामपंचायतीसाठी २ नामांकन असे २६ नामांकन आले. चामोर्शी तालुक्यातील गौरीपूर ग्रा.पं.मधून एक, आमगावसाठी एक, वेलगूर ग्रामपंचायतीत दोन, मारोडा ग्रामपंचायतीत पाच, लखमापूर ग्रामपंचायतसाठी एक असे एकूण १० नामांकन दाखल झाले आहेत. आरमोरी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींपैकी केवळ वैरागडसाठी दोन नामांकन दाखल झाले आहेत. कुरखेडा तालुक्यात ७ तर सिरोंचात ५ नामांकन दाखल झाले. एटापल्ली तालुक्याची माहिती प्राप्त झाली नाही.थकीत कर भरण्यासाठी धावपळनिवडणूक लढण्यासाठी उमेदवाराच्या अंगावर ग्रामपंचायतींच्या कोणत्याही कराची थकबाकी नसणे बंधनकारक आहे. तसे असल्याचे पुढे अपात्र होण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे संभाव्य उमेदवारांना त्यांचे थकीत कर भरण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. काही गावांमध्ये तर पॅनल लढण्यासाठी इच्छुक गावपुढाऱ्यांना आपल्या कार्यकर्त्यांचा थकीत कर भरण्यासाठी स्वत:च्या खिशातून पैसे भरावे लागत आहे. काही ठिकाणी नेते मंडळींचा खिसा रिकामा होत आहे.
शेवटच्या टप्प्यात सरपंचपदाचे आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST
नामांकन दाखल करण्यासाठी १३ मार्चपर्यंत मुदत आहे. ऐन वेळेवर म्हणजे काही तालुक्यात दि.११ ला तर काही तालुक्यात दि.१२ ला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी बाशिंग बांधून आपले पॅनल उभे करण्यासाठी सज्ज झालेल्या लोकांचा ऐनवेळी हिरमोड होण्याची शक्यता आहे.
शेवटच्या टप्प्यात सरपंचपदाचे आरक्षण
ठळक मुद्देबुधवार-गुरूवारचा मुहूर्त : उशिरा नियोजन झाल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम, इच्छुकांची उडणार तारांबळ