गृहरक्षकांना पेन्शन लागू करण्याची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या ३० वर्षांपासून अनेक नागरिक गृहरक्षकपदावर काम करीत आहेत. गृहरक्षकांना १ एप्रिल २०१४ पासून ४०० रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला. मात्र गृहरक्षकांना बारमाही रोजगार मिळत नाही. वर्षातून केवळ सहा महिनेच रोजगार दिला जातो. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा निर्माण झाला आहे.
तुकुम येथे पसरली अस्वच्छता
धानोरा : तालुक्यातील तुकुम येथे सर्वत्र अस्वच्छता पसरली असल्याने गावात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. तुकुम येथील नाल्या पूर्णत: बुजल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. पाणी साचून राहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांची होरपळ
गडचिरोली : गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्यात वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. सिलिंडरमध्ये दर महिन्याला वाढ होत असल्याने महिनाकाठी सिलिंडरची उचल करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच पंचाईत होत आहे. सरकारने सिलिंडरच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ केली. अनेकांची सबसिडीही बंद झाली आहे. अनेक नागरिक सरपणावरच स्वयंपाक करीत असल्याचे दिसून येत आहे.
शासकीय आश्रमशाळेतील सोलर वॉटरहिटर बंदच
कुरखेडा : आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी हिवाळ्यात आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे यासाठी आश्रमशाळांना सोलर वॉटरहिटरचा पुरवठा करण्यात आला. मात्र आश्रमशाळांतील सोलर वॉटरहिटर वापराअभावी बंदच असल्याचे दिसून येते.
रेव्हेन्यू कॉलनीचा विकास करण्याची मागणी
गडचिरोली : येथील रेव्हेन्यू कॉलनीचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कॉलनीतील काही वॉर्डांमध्ये पक्के रस्ते व नालीचे बांधकाम करणे गरजेचे आहे. याशिवाय ओपन स्पेसचाही विकास रखडला आहे. परिसरातील ओपन स्पेसमध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण करून विकासकामांत व्यत्यय आणल्याने सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
कोरची तालुक्यात मोठ्या धरणाची निर्मिती करा
कोरची : शासन व प्रशासनाच्या वतीने कोरची तालुक्यात विविध कृषी योजना राबविल्या जात आहेत. या योजनेतून सिंचन विहीर, मजगीची कामे होत आहेत. मात्र मोठ्या धरणाशिवाय विहीर व शेततळ्यामध्ये पाणीसाठा राहणार नाही. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागेल. त्यामुळे शासनाने ठोस निर्णय घेऊन कोरची तालुक्यात मोठ्या धरणांची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी
गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे.
कॉप्लेक्समध्ये प्रसाधनगृह निर्माण करण्याची मागणी
गडचिरोली : जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. गडचिरोली शहरात व कॉम्प्लेक्स परिसरात अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे येथे प्रसाधनगृह निर्माण करावे, अशी मागणी होत आहे. बसथांबा असलेल्या चामोर्शी, धानोरा, आरमोरी मार्गावर पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह नाही. त्यामुळे महिला व पुुरुषांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
डिझेलसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या
आलापल्ली : शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी डिझेलवर चालणारे इंजिन अनुदानावर वाटप करण्यात आले. मात्र पेट्रोलचे दर गगनाला भिडले असल्याने शेतकऱ्यांना या इंजिनचा वापर करताना अडचण निर्माण होत आहे.
चौडमपल्ली नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम करा
आष्टी : आष्टी- अहेरी मार्गावर असलेला चौडमपल्ली नाला ठेंगणा असल्याने पावसाळ्यादरम्यान या पुलावरून पाणी वाहत राहते. त्यामुळे अनेकवेळा वाहतूक खंडित होते. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.