मदत : ४ हजार ६२९ शेतकऱ्यांना लाभगडचिरोली : २०१५-१६ या खरीप हंगामात पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी ४ हजार ६२९ शेतकऱ्यांच्या १८ कोटी १९ लाख २० हजार रूपयांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले आहे. बहुतांश शेतकरी राष्ट्रीयकृत, सहकारी व ग्रामीण बँकांकडून कर्ज घेऊन शेतीची मशागत करतात. मागील वर्षी राज्यभरात कोरडा दुष्काळ पडला होता. याची झळ गडचिरोली जिल्ह्यालाही बसली होती. रोवलेले धानपीक करपल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नव्हता. त्यामुळे धानपिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. राज्य शासनाने जे शेतकरी पूर्णपणे कर्ज भरू शकत नाही, अशा शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय घेतला. एकूण कर्जापैकी ८ हजार ९०१ शेतकऱ्यांचे २६ कोटी ४५ लाख रूपयांचे कर्ज पुनर्गठणासाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ४ हजार ६२९ शेतकऱ्यांचे १८ कोटी १९ लाख २० हजार रूपयांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले आहे. पात्र शेतकऱ्यांपैकी ३ हजार ९३९ शेतकऱ्यांनी ६ कोटी ४ लाख रूपयांचे कर्ज स्वत: भरले आहे. (नगर प्रतिनिधी)
१८ कोटींच्या कर्जाचे पुनर्गठण
By admin | Updated: September 2, 2016 01:12 IST