सत्तामिलन : जि.प.मध्ये आघाडी करताना काँग्रेसने राकाँला सुनाविलेगडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये आघाडी झाली. मात्र ही आघाडी करताना काँग्रेस नेत्यांनी राकाँच्या जिल्हा नेतृत्वाला विधानसभेत पक्षाकडून बंडखोरी झाली तर याद राखा, असा मोठा दम भरल्याची दोन्ही पक्षाच्या राजकीय गोटात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस १४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. कालांतराने भामरागड तालुक्यातील काँग्रेसच्या सदस्य मदनी बोगामी यांनी राजीनामा दिल्याने ही जागा काँग्रेसच्या हातून गेली. १३ सदस्याच्या काँग्रेस सोबत त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी न करता भाजपसोबत घरठाव करीत भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांना अध्यक्ष पदावर विराजमान केले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सत्तेत काँग्रेसला नेहमी पडती भूमिका घ्यावी लागत होती. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने राज्य पातळीवरूनही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आघाडीबाबत सुतोवाच केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट या अडीच वर्षाच्या काळात पडली. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या दुसऱ्याही गटासोबत हात मिळवणी करू शकले असते. परंतु जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने काँग्रेसची मनधरणी केल्याने काँग्रेसने धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेताना काँग्रेसच्या वाट्यातील आरमोरी व गडचिरोली या दोनही विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुठलीही बंडखोरी होणार नाही, असा पक्का शब्द घेण्यात आला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. आघाडीची चर्चा होत असताना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर या निवडणूक लढणार नाहीत ना ? अशी विचारणा दस्तखुर्द धर्मरावबाबा आत्राम यांनाच केली, अशीही माहिती आहे. काँग्रेसचा पोरेड्डीवार गट वगळता. डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे या सर्वांना राष्ट्रवादीच्या बंडखोरीबाबत चिंता होती. त्यामुळे काँग्रेसने जिल्हा परिषदेमध्ये दोन पक्षाची आघाडी करताना विधानसभेत बंडखोरी होणार नाही, याचा शब्द राकाँकडून घेतला आहे, अशी माहिती आहे. आघाडी धर्माचे पालन करू, असे आश्वासन राकाँच्या नेतृत्वाने काँग्रेसला दिल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना याची पूर्ण माहिती दिली व काँग्रेस राकाँ आघाडीवर अंतिम शिक्कामोर्तब झाले. (जिल्हा प्रतिनिधी)
बंडखोरी कराल तर याद राखा!
By admin | Updated: September 22, 2014 23:18 IST