गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता समिती व विशाखा महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गोकुळनगर येथील सम्यक बुद्धविहाराच्या प्रांगणात मंगळवारी वर्षावास समापन तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता समितीचे अध्यक्ष रोहीदास राऊत, गडचिरोली प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. अनिल धामोडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सी. पी. शेंडे, सीताराम टेंभुर्णे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना प्रा. धामोडे म्हणाले की, भारताच्या भूमीत जन्माला आलेला बुद्धधम्म आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. शांतीचा पुरस्कार करणारा हा धर्म आहे. ज्या देशांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला त्या देशांनी भरपूर प्रगती केली आहे. विश्वशांतीसाठी बुद्ध धम्माच्या तत्वांचे पालन करावे, असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ तुकाराम राऊत यांच्याकडून बक्षीस म्हणून देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम मेश्राम, संचालन जगन जांभुळकर तर आभार प्रदीप भैसारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विशाखा महिला मंडळाच्या अध्यक्ष सुमित्रा राऊत, सचिव मनिषा कावळे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
गोकुळनगरात वर्षावासाचा समारोप
By admin | Updated: October 15, 2014 23:18 IST