सहा हजार अर्ज : ऑनलाईन संवादातून शंका समाधानाचा प्रयत्नलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनच्या कालावधीतील तीन महिन्यांचे वीज बिल ग्राहकांना एकाच वेळी जून महिन्यात प्राप्त झाले. वीज वापरापेक्षा अधिकचे बिल आल्याचा संशय ग्राहकांना असल्याने महावितरणकडे तक्रारी वाढल्या. जिल्हाभरातील सुमारे ५ हजार ७७० ग्राहकांनी वीज बिलाबाबत तक्रारी केल्या आहेत.२४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी संचारबंदी सुध्दा लागू करण्यात आली. मिटरचे रिडींग घेणे बंद करण्यात आले. तसेच वीज ग्राहकांना कागदी बिल सुध्दा पोहोचविले जात नव्हते. मार्च ते मे महिन्याचे बिल सरासरी पाठविले जात होते. काही ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केला. काही ग्राहकांनी मात्र तिनही महिन्यांचे वीज बिल भरले नाही. जून महिन्यात मीटर रिडींग करण्यात आली. त्यानंतर तीन महिन्यांचे एकाच वेळी वीज बिल पाठविण्यात आले. आपल्या वापरापेक्षा अधिकचे बिल पाठविण्यात आले, असा संशय ग्राहकांना असल्याने ग्राहकांची ओरड सुरू झाली. ग्राहकांच्या तक्रारींचे समाधान करण्यासाठी महावितरणने उपविभाग, विभाग व प्र-विभाग कार्यालय स्तरावर तक्रार निवारणासाठी वेबिनार आयोजित केले. तसेच ग्राहकांना लेखी तक्रारही करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. जिल्हाभरातील ७९ ग्राहकांनी आॅनलाईन तक्रारी दाखल केल्या तर ५ हजार ६९२ नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन तक्रार अर्ज सादर केले आहेत. तक्रारींचे निरसन करण्यासाठी उपविभाग, विभाग व प्र-विभागस्तरावर स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. वीज बिल प्राप्त होऊन आता महिनाभराचा कालावधी उलटला तरी अजुनही वीज ग्राहकांच्या तक्रारींचा ओघ सुरू आहे.महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्याच्या कालावधीत वीज बिलाबाबत एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाभरात २० जुलैपर्यंत ३२ वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.सर्वाधिक तक्रारी गडचिरोली उपविभागातगडचिरोली उपविभागात गडचिरोली शहराचा समावेश आहे. गडचिरोली शहराची लोकसंख्या ६० हजारच्या जवळपास असून ३० हजार पेक्षा अधिक ग्राहक आहेत. घरगुती ग्राहकांसोबतच व्यावसायिक ग्राहकांची संख्या सुध्दा अधिक आहे. गडचिरोली उपविभागात जुलै महिन्यात वीज बिलाबाबत सुमारे ३ हजार २३६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्वच तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे.तुटलेल्या विजेच्या ताराला स्पर्श करू नकापावसाळ्यात वादळ, वारा, पाऊस यामुळे खांबांवरील विजेच्या तारा तुटून पडतात. वीज तारांना स्पर्श झाल्याने नागरिक मृत्यूमुखी पडल्याच्या घटना गडचिरोली जिल्ह्यात घडल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी शेतात किंवा गावात विजेचे तार लोंबकळत असेल किंवा जमिनीवर पडले असेल तर त्या ताराला स्पर्श करू नये. याबाबतची माहिती तत्काळ महावितरणला कळवावी. गावातील विद्युत खांबाला जनावरे बांधू नये. घराचे बांधकाम वीज तारांपासून काही दूर अंतरावर करावे. घरी असलेल्या विद्युत उपकरणांची अर्थिंग बरोबर आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन महावितरण गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे व कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी केले आहे.
विद्युत बिलांबाबत पडला तक्रारींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST