आलापल्ली : खासदार अशोक नेते यांनी आलापल्ली येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अहेरी तालुक्यातील नागरिकांनी शेकडो प्रलंबित समस्या खासदारांच्या लक्षात आणून दिल्या. अहेरी तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खा. अशोक नेते यांनी अहेरी तालुक्याचा १५ एप्रिल रोजी दौरा केला. दौऱ्यादरम्यान या तालुक्यातील अनेक समस्या खासदारांच्या लक्षात आल्या. नागरिकांनीही खासदारांसमोर समस्या मांडल्या. प्रत्यक्ष समस्या जाणून घेतल्यानंतर आलापल्लीत बैठक आयोजित केली. यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, जिल्हा सचिव भारत खटी, अहेरी तालुकाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, भाजयुमोचे सतीश गोटमवार, अहेरीचे तालुका उपाध्यक्ष सुकूमार हलदर, महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य सिद्धीकी, महिला आघाडी तालुकाध्यक्ष किरण भांदककर, मालू तोडसाम, राजू तोडसाम, राजू ठुसे, अशोक आत्राम आदी उपस्थित होते.यावेळी नागरिकांनी वन जमिनीचे पट्टे मागील अनेक वर्षांपासून मिळाले नाही. तहसील व उपविभागीय कार्यालयाच्या चकरा मारून नागरिक त्रस्त झाले आहेत. घरकूल मंजूर झाले आहेत. मात्र त्यासाठी निधी मिळाला नाही. वृद्ध व निराधार नागरिकांना श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अपघातांची शक्यता बळावली आहे. नदी, नाल्यांवर पुलाचे बांधकाम झाले नाही. ग्रामीण भागातील शेकडो हातपंप नादुरूस्त असल्याने पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. आदी समस्या लक्षात आणून दिल्या. नागरिकांची समस्या जाणून घेतल्यानंतर खा. अशोक नेते यांनी रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी विशेष प्राधान्य दिले जाईल, हातपंप दुरूस्तीसाठी संबंधित विभागाला निर्देश दिले जातील, अहेरी तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वृद्ध नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याच्या सूचना दिल्या जातील, असे सांगितले. बैठकीला अहेरी परिसरातील शेतकरी, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदारांसमोर समस्यांचा पाढा
By admin | Updated: April 18, 2015 01:33 IST