गडचिरोली : राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी आज शनिवारी गडचिरोली जिल्हा परिषदेत १०० वर अधिक शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षणात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करा. यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षकांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्यातील उपक्रमशील व धडपड्या शिक्षकांची विशेष संवाद साधण्याचा कार्यक्रम शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड उपस्थित होते. यावेळी नंदकुमार यांनी शिक्षकांचा बहुतांश वेळ हा प्रशिक्षण कामात खर्च होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या कामात वेळ देता येत नाही. आता हे सारे बंद झाले पाहिजे. शिक्षकांनी स्वत:ला माहिती तंत्रज्ञानाच्या कक्षेत विकसित करण्याचा प्रयत्न करावा, व्हॉटस्अॅपसारख्या साधनांचा वापर करून शिक्षकांनी आपला वेळही वाचवावा, शासनाचे एखादी परिपत्रक, अधिसूचना मिळविण्यासाठी आपण अनेकदा शैक्षणिक काम सोडून जातो, पाच मिनिटाचे काम करण्यासाठी तास-दीडतासाचा अवधी यासाठी घालवावा लागतो, एखाद्या शिक्षकाकडे जर हा जीआर असेल तर त्यांनी व्हॉटस्अॅपसारख्या साधनांद्वारे तो इतरांनाही पाठविला पाहिजे. आपला विद्यार्थी गणित, विज्ञान, भाषा या सर्व विषयात पारंगत बनविण्याची जबाबदारी शिक्षकांनी स्वीकारून त्याला घडविण्यासाठी कठोर परीश्रम करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.शिक्षकांनी सांगितल्या आपल्या अडचणीअहेरी तालुक्यातील एका उपक्रमशील शिक्षकाने आपली आपबिती प्रधानसचिव नंदकुमार यांना सांगितली. मी गावातील शाळेत अतिशय चांगले काम करीत होतो. मात्र मुख्यालयी राहणे, शक्य नव्हते. मुख्यालयाच्या वादात माझी बदली करण्यात आली व माझी वेतनवाढही थांबविण्यात आली. माझ्यातील असलेला उत्साह या कारवाईने पूर्णपणे मावळला, अशी आपबिती त्यांनी मांडली. या प्रसंगी सुधीर आखाडे या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी शिक्षकांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी चांगले प्रयत्न करण्याचे आवाहन केले. याशिवाय अनेक शिक्षकांनी मुक्त संवाद शिक्षण विभागाच्या सचिवांशी साधला. गडचिरोलीनंतर भंडारा, गोंदिया जिल्ह्यात प्रधानसचीव कार्यक्रम घेणार आहेत.
शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी घेतला १०० शिक्षकांचा तास
By admin | Updated: February 15, 2015 01:06 IST