यांत्रिकीकरणाचा दुसरा टप्पा : ४५ गटांना मिळणार यंत्रजि.प. कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत यांत्रिकीकरण प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दुसऱ्या टप्प्याच्या नियोजनाचा प्रस्ताव मानव विकास अभियानाच्या औरंगाबाद येथील आयुक्तांकडे सादर केला आहे. या प्रस्तावानुसार २०१५ च्या खरीप हंगामात ९० टक्के अनुदानावर जिल्ह्यातील ४५ शेतकरी गटांना ५ कृषी यंत्राचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये पॉवर टिलर, कोनोविडर, पॉवर विडर, भात रोवणी, भात कापणी व भात मळणी यंत्राचा समावेश आहे. एका शेतकरी गटाला जवळपास साडेचार लाखाचे कृषी यंत्राचा संच देण्यात येणार आहे. या योजनेत संबंधित शेतकरी गटांना लाभार्थी हिस्सा म्हणून १० टक्के रक्कम कृषी विभागाकडे अदा करावयाची आहे. जिल्ह्यातील ४५ शेतकरी गटांना यंत्राचा संच पुरविण्यासाठी जवळपास २ कोटी ३९ लाख ३५ हजार रूपयाचा खर्च येणार आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र मानव विकास अभियानाच्या कार्यक्रमातून निधी मिळणार आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर जिल्हा परिषद कृषी विभाग यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ४५ शेतकरी गटांना कृषी यंत्र संचाचा पुरवठा करणार आहे. यामध्ये पुरूष व महिला शेतकरी गटाचा समावेश राहण्याची शक्यता आहे. गतवर्षी २०१३-१४ मध्ये मानव विकास अभियान व जिल्हा वार्षिक योजना तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत करण्यात आलेल्या यांत्रिकीकरणाचा आढावा नुकताच कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोलीत घेतला. राज्यात प्रथमच गडचिरोली जिल्ह्यात यांत्रिकीकरण प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी झाली असल्याचे कृषी विभागाचे कृषी आयुक्तालयाचे सहसंचालक डी. बी. देशमुख, कृषी उपसंचालक डॉ. राम लोकरे, कृषीचे मुख्य निरिक्षक किशोर डेरे यांनी कबुली दिली होती.
यांत्रिकीकरणाचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर
By admin | Updated: January 3, 2015 23:00 IST